मुंबई, 15 डिसेंबर : सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलन (Freedom Movement) आणि स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पटेल यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी जास्त योगदान दिलं की स्वातंत्र्यानंतर हे ठरवणे अवघड आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या एकीकरणातील (Unification of India) त्यांची अतुलनीय भूमिका अधिक लक्षात राहते. पण एकेकाळी राजकारणापासून दूर राहणाऱ्या पटेल यांच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले, ज्यामुळे ते देशाचे सरदार आणि लोहपुरुषाच्या उंचीपर्यंत पोहोचले.
लहानपणापासून स्वावलंबनाचे धडे
31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे जन्मलेल्या वल्लभभाई पटेल यांचे जीवन लहानपणापासूनच संघर्षमय होते. झवेरभाई पटेल आणि लाडबा देवी यांच्या सहा मुलांपैकी ते चौथे होते. त्यांचे शिक्षण मुख्यतः स्वयंअध्ययनातून झाले. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि याचे कारण त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती होती. ते अभ्यासात कधीच कमकुवत नव्हते, पण क्वचितच त्यांची इच्छा व्यक्त करत असे. स्वखर्चाने त्यांनी स्वतःच्या अभ्यासाचे नियोजन केले आणि इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
इंग्लंडहून परतल्यानंतर जीवनशैली बदलली
शिक्षण घेत असतानाच ते वकील झाले, पण वयाच्या 36 व्या वर्षीच बॅरिस्टर होण्याचं स्वप्न ते पूर्ण करू शकले. अहमदाबादमध्ये ते एक यशस्वी वकील म्हणून प्रसिद्ध झाले. इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी युरोपियन शैलीचे जीवन जगणे पसंत केले. ब्रिज खेळण्याची त्यांना खूप आवड होती. सूटबूट घालून राहायचे, पण वकिलीची आवड खूप होती. एकदा कोर्टात उलटतपासणी सुरू असताना पत्नीच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली तरी त्यांनी उलटतपासणी मध्येच सोडली नाही, असे सांगण्यात येते.
राजरारणात प्रवेश
पटेल यांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. एकदा अहमदाबादला गांधीजींची सभा होणार होती, तेव्हा त्यांनी तिथे जाण्याऐवजी ब्रिज खेळणे पसंत केले. त्यांनी मित्रांच्या सांगण्यावरून 1917 मध्ये अहमदाबाद महापालिका निवडणूक लढवली आणि जिंकली. यापूर्वी त्यांना महात्मा गांधींबद्दल आस्था नव्हती.
गांधीजींबद्दलच्या धारणा
याचदरम्यान त्यांना गांधीजींचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते सिगार ओढत असताना त्यांना ऐकत होते. हळूहळू गांधीजींमध्ये काहीतरी आहे, याची त्यांना जाणीव झाली. तेव्हापासून त्यांच्या गांधीजींबद्दलच्या दृष्टीकोनात बदल होत गेले. नीळ चळवळीतील गांधीजींच्या योगदानाने ते खूप प्रभावित झाले. नंतर गांधीजींबद्दलची त्यांची धारणाही बदलली.
Mahatma Gandhi On Hindu | महात्मा गांधींसाठी हिंदू असण्याचा अर्थ काय होता?
दोघांमधील जुगलबंदी
पटेल गांधीजींमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी आपली जीवनशैली बदलून देशसेवा हाच आपला सर्वात मोठा धर्म मानला. बघता बघता दोघांचीही विशेष जुगलबंदी दिसू लागली. गुजरात सभेचे अध्यक्ष म्हणून गांधीजी आणि सचिव म्हणून पटेल यांनी एका महान टीमप्रमाणे काम केलं. या दोघांनी गुजरातमध्ये लोककल्याणाचे अनेक कार्यक्रम यशस्वी केले.
प्रत्येक आंदोलनात सोबत
प्लेगच्या प्रादुर्भावाच्या वेळी त्यांनी एकत्रितपणे पीडितांसाठी सेवा कार्य केलं. बंधू-मजुरांच्या आंदोलनापासून ते खेडा सत्याग्रहातील कर न भरण्याच्या आंदोलनापर्यंत, पटेल हे गांधींचे सर्वात विश्वासू सहकारी असल्याचे दिसून आले. खेडा सत्याग्रह ही पटेलांची पहिली स्वातंत्र्य चळवळ होती. यानंतर असहकार आंदोलन, स्वराज आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलनात पटेल गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले.
पटेल यांनी गांधीजींना त्यांच्या वक्तृत्वाने नेहमीच प्रभावित केले. गांधीजींना पटेलांची विनोदबुद्धी खूप आवडत होती. 1932 मध्ये दोघेही येरवडा तुरुंगात असताना पटेल गांधीजींकडून संस्कृत शिकले होते. पटेलांना सरदार ते लोहपुरुष बनवण्यात गांधीजींचे मोठे योगदान होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Mahatma gandhi, Political leaders