मुंबई, 14 मे : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती (sambhaji maharaj jayanti) आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी जन्मापासूनच त्यांच्यावर अनेक संकटे आली. मात्र, त्या संकटांच्या छाताडावर पाय रोऊन संभाजी महाराजांनी समर्थपणे झेप घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या खांद्यावर पेलली. इतकेच नाही तर अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कुठेही त्यांना कधीच अपयश आलं नाही. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं होतं. तुम्हीही शंभूप्रेमी किंवा इतिहासप्रेमी असाल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत. संभाजी राजेंचा जन्म संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी महाराजांना अगदी लहान असल्यापासून दुःख सोसावं लागलं. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिलं. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले. आग्रा मोहीम छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत नेलं होतं. त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले.
हेही वाचा - गोष्ट मान्सूनची, कधीही न वाचलेल्या प्रवासाची! ..तर उत्तर भारतातील मैदानी भागात पाऊस पडलाच नसता
चौदाव्या वर्षी संस्कृत ग्रंथ संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर कमी कालावधीत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे या एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. हेही वाचा - सगळीकडे व्हायरल होणाऱ्या Black Hole च्या फोटोमागचं सत्य माहितीय का? हौतात्म्यामुळे अजरामर 1689 च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.