मुंबई 31 मे: प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी (Chandramukhi) या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सलग 4 आठवड्यांपेक्षा जास्त हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चंद्रमुखीमधलं चंद्रा हे गाणं रिलीज झाल्यावर त्याला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. चंद्राच्या गाण्यावर थिरकण्याचा, त्यावर भन्नाट परफॉर्मन्स करण्याचा मोह अनेकांना टाळता आला नाहीये. यातच आता श्रेया घोषाल या गायिकेचं नाव सुद्धा जोडलं पाहिजे. श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) नव्या रीलची जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. श्रेया इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते. तिच्या गाण्यांचे रील आवर्जून शेअर करत असते. तसं पाहिलं तर श्रेयाने अनेक मराठी गाणी गायली असल्याने तिचं मराठी प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालं आहे. तिच्या या नव्या रील मुळे तिचे महाराष्ट्रातील चाहते खुश होणार याची नक्की खात्री आहे. ‘चंद्रा’ (Chandra song) या गाण्याच्या मूळ गायिकेला सुद्धा या गाण्याचं एवढं वेड लागलं आहे की तिने सुद्धा एक अफलातून रील शेअर करत चंद्रमुखी टीमचं अभिनंदन केलं आहे. या रीलला कॅप्शन देत ती लिहिते की, “चंद्राची जादू एवढी तगडी आहे की मी सुद्धा एक रील बनवूनच टाकलं. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून त्याचा अल्बम मी लूपवर पुन्हा पुन्हा ऐकते आहे.” यात तिने विशेष करून अमृता खानविलकर आणि संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांचं खास कौतुक केलं आहे.
या रीलवर अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. स्वतः अमृताने देखील कमेंट केली असून श्रेयाला तिने साक्षात देवीची उपमा दिली आहे. श्रेयाचं चंद्रमुखी चित्रपटाशी सुद्धा खास नातं आहे. तिने स्वतःच चंद्रा, तू चांद राती अशी दोन गाणी गायली आहेत. तिने याआधी ही अमृताला खास मेसेज करून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. हे ही वाचा- सो कुल चा cool अंदाज, शूटिंगच्या निमित्ताने सोनालीचा travel mode on! श्रेया आणि संगीत दिग्दर्शक अजय-अतुल या जोडीने याआधीही एकत्र येऊन अनेक कमालीची गाणी प्रेक्षकांना दिली आहेत. ही जोडी प्रेक्षकांना खुश करण्यात आजपर्यंत कधी फेल गेली नाही. चंद्रमुखीच्या या गाण्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारत आणि परदेशातल्या लोकांना सुद्धा वेड लावलं आहे. यावर रील बनवणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये गेली आहे. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट तुफानी वेगात थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चंद्राने दौलतरावांनाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे.