मुंबई, 21 ऑक्टोबर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गेली अनेक दिवस प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत आहेत. येत्या 11 नोव्हेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मात्र त्याआधी सिनेमाची टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर गोदावरी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. सिनेमातील सगळ्या कलाकारांची पहिली झलक टीझरमधून समोर आली. अभिनेता जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळाले. आता या चित्रपटातील सुंदर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘गोदावरी’ हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. टीझरमध्ये जितेंद्र जोशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नातेसंबंधातील चढउतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळतं आहे. पण या कुटुंबाचं आणि ‘गोदावरी’चं नक्की काय नाते आहे, हे सध्या गुलदस्त्यात असले तरी लवकरच याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘गोदावरी’ चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नदी जशी सगळं काही पोटात सामावून वर्षानुवर्षे वाहतच राहते, तसच काहीस आयुष्याच होताना दिसतंय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत चालत आलेला वारसा आणि त्यात गुंतणारे भावविश्व यांचं उत्तम वर्णन ह्या गाण्यातून होताना दिसते. मन प्रसन्न करणारे ‘खळ खळ गोदा’ हे गाणे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून आयुष्याच्या नागमोडी प्रवाहात वाहताना दिसून येत आहे. हेही वाचा - Rupali bhosale : संजनाच्या हातात कोणाचं बाळ? ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खळखळून वाहणाऱ्या गोदावरी या चित्रपटातील “खळ खळ गोदा” या गाण्याचे बोल जितेंद्र जोशी यांचे असून, संगीत दिग्दर्शनाची धुरा एव्ही प्रफुल्लाचंद्रा यांनी सांभाळली आहे. राहुल देशपांडे यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. गाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत राहुल असे म्हणतात की, ‘‘या गाण्याचे बोल खूप खोलवर विचार करायला लावणारे आहेत. नकळत हे गाणे आपल्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी, भावना सांगून जातात. मला आशा आहे, हे गाणे श्रोत्यांनाही नक्कीच भावेल.’’
गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात की ’’ हे गाणे खूप प्रेरणा देणारे आहे. बऱ्याच भावना या गाण्यातून व्यक्त होत आहेत. त्यात राहुल देशपांडे यांचा आवाज आणि एव्ही प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभल्याने या गाण्याला चारचाँद लागले आहेत. दिवाळीही लवकरच येत आहे. यानिमित्ताने हे खास स्फूर्तिदायी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.’’
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नात्यांची मूल्य सांगणारा, रुढी, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण असलेला, असा हा कौटुंबिक चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.