मुंबई 24 जून: सध्या राज्यात (Maharashtra Political crisis) एक वेगळं राजकीय तणावाचं वातावरण दिसत आहे. शिवसनेच्या गटात झालेल्या या बंडांनंतर आता अनेकांचं लक्ष केवळ प्रसारमाध्यमांकडे खिळून राहिलं आहे. रोज येणाऱ्या नवनव्या अपडेट्समुळे जनतेचं लक्ष पुढे काय होणार यावर लागलेलं असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी समाजमाध्यमांचा चांगलाच क्लास घेतल्याचं समोर येत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे कायमच त्यांच्या राजकीय मतांबद्दल सूचक आणि नेमकी वक्त्यव्य करताना दिसतात. ते सोशल मीडियावर (Kedar Shinde Instagram) सुद्धा बरेच ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या नाटकांच्या आठवणी, नवीन प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट्स देताना ते सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्याच्या चाललेल्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा त्यांनी आपलं मत सोशल मीडियावरून मांडत समाजमाध्यमांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांच्या नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ते म्हणतात, “#newschannel यांनी राजकारणी लोकांच्या पालख्या उचलण्यापेक्षा #पालखीसोहळा वारकऱ्यांचा दाखवणे उत्तम.. पुण्यतरी लाभेल. बस करा आता २४*७ तीच तीच करमणूक.. तुमचं काय मत? केदार शिंदे यांनी समजामध्यमांच्या त्याच त्या रटाळपणाला निशाणा करत त्यांचा खरमरीत शब्दात समाचार घेतला आहे. आज कोव्हिडच्या संकटानंतर दोन वर्षांनी आषाढी वारी मोठ्या उत्साहात पंढरपूरला निघाली आहे. असं असताना सुद्धा प्रसारमाध्यमांकडून फक्त राजकारणाला दिलेल्या महत्त्वावर ते व्यक्त होताना दिसले.
त्यांनी चाहत्यांना सुद्धा त्यांचं मत विचारलं आणि चाहते त्यावर आपली भूमिका घेताना दिसले. त्यांनी या सगळ्या प्रकाराला ‘करमणूक’ असं सुद्धा म्हणाल्याचं दिसून येत आहे. यावर अनेकांनी त्यांच्या मताला दुजोरा देत ‘खरं आहे, दोन वर्षांनी पाळी सोहळा होत आहे तर तो दाखवायचा सोडून फक्त राजकारणावर लक्ष दिलं जात आहे.” असं सुद्धा म्हणलं आहे. केदार शिंदे यांच्या या पोस्टची आणि त्यांच्या राजकीय भूमिकेची बरीच चर्चा होताना दिसत आहे. हे ही वाचा- ‘अशी सुंदरी दुसरी नाही’,अमृता खानविलकरच्या फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा केदार शिंदेंच्या आगामी काळात येणाऱ्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. अंकुश चौधरी यात शाहीर साबळे यांची भूमिका साकारत असल्याने अनेकांची उत्सुकता आता वाढली आहे.