मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. आता या वादात गुंडांनीही उच्छाद मांडला आहे. हिमाचल प्रदेशमधील काही गुंडांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे.
कंगना राणावत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेश मधून सतत धमकीचे फोन आले. 'कंगना राणावत से दूर रहो...ये बात समझ लो...तुमने गलत किया अभी भी संभल जाओ नही तो...' अशा आशयाचे धमकीचे फोन गृहमंत्र्यांना आले.
धमकीचे हे फोन हिमाचल प्रदेशमधून आले आहे. मंगळवारी दिवसभरात काही फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाहीतर आज कंगना मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे आज भल्या पहाटे पण काही फोन आल्याची माहिती मिळाली आहे.
वेगवेगळ्या नंबरवरून गृहमंत्र्यांना फोन करून धमकीचे सत्र सुरू आहे. याआधीही दुबईहुन काही गुंडांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन केले होते.
अनिल देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात मंगळवारी निषेध ठराव मांडला. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनावर कारवाई करावी असे पत्र लिहिले आहे. या पत्राची दखल घेत गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनीही कंगनाविरोधात हक्कभंग आणला आहे.
दरम्यान, आज कंगना ठरल्याप्रमाणे मुंबईत दाखल होणार आहे. कंगणा राणावतची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे तिचा विमान प्रवास करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज दुपारी चंदिगड येथून विमानाने १२ वाजता कंगणा मुंबईसाठी निघणार आहे. मुंबईत आल्यावर शिवसेना कंगणा राणावतचं कशाप्रकारे स्वागत करताय, याकडे आज सर्वांचं लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.