मोठी बातमी! सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील तपास प्रकरणात फडणवीसांचीही उडी, ED ने लक्ष घालण्याची मागणी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सुरू असेलेल्या तपासाच्या वादामध्ये उडी घेतली आहे. मनी लाँड्रिंगचा अँगल समोर आल्याने ईडीने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता राजकीय वळण देखील मिळू लागले आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे स्पष्ट केले होते की, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही कारण तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मात्र आता याबाबत राज्यात वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखव करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लाॅंड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
There is a huge public sentiment about handing over #SushantSinghRajput case to CBI but looking at the reluctance of State Government, atleast @dir_ed ED can register an ECIR since misappropriation and money laundering angle has come out.
तर दुसरी कडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी असा आरोप केला आहे की, या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास निष्पक्ष नाही.
दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करून त्याचा खून का झाला असावा याबाबत 26 मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधानांना पत्र लिहण्यापासून ते याप्रकरणातील गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी वकील नेमण्यापर्यंत सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्येचा छडा लावण्यासाठी विशेष जोर दिला आहे.