अखिलेश सोनकर, प्रतिनिधी चित्रकूट, 6 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. हत्या, आत्महत्या तसेच खुनाच्या घटनाही समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात रेल्वे रुळावर एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धनराज असे मृताचे नाव आहे. गावातीलच अशोक यादव याने धनराज याचा 20 रुपयांच्या वादातून खून केला, असा आरोप धनराजच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना शिवरामपूर चौकी परिसरातील तराव गावची आहे. येथे धनराज नावाचा तरुण गावातच चाट विकायचा. 5 दिवसांपूर्वी अशोक यादव नावाच्या तरुणाने धनराजकडून 20 रुपयांची चाट उधार खाल्ली होती. त्यामुळे परवा धनराजने त्याच्याकडे 20 रुपये उसने मागितले असता अशोक यादवने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत मजल गेली. त्यानंतरच लोकांनी मध्यस्थी करून दोघांची सुटका केली. यादरम्यान अशोक यादव याने धनराजला बघून घेण्याची धमकीही दिली होती.
सायंकाळी उशिरा धनराज चाट स्टॉल बंद करून घरी गेला. धनराज दुसऱ्या दिवशीच्या खरेदीसाठी चाटसाठी लागणारा सामान घेण्यासाठी बाहेर पडला. पण पुन्हा तो घरी पोहोचलाच नाही. रात्री नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. पण तो मिळून आला नाही. दुसरीकडे, जीआरपी पोलिसांनी धनराजचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला काढून शिवरामपूर चौकी पोलिसांच्या ताब्यात दिला. यानंतर धनराजचा खून झाल्याचे समोर आले. शिवरामपूर पोलिसांनी धनराजच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देताच, त्यांना मोठा धक्का बसला. 20 रुपयांच्या वादातून आरोपी अशोक यादव याने खून केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला म्हणाल्या की, मृताच्या नातेवाईकांनी हत्येचा आरोप केला आहे. युवकाचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला. आता काहीही सांगणे कठीण होईल. तरुणाच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच काही सांगता येईल. याप्रकरणी जो दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.