नवी दिल्ली, 17 मार्च: देशातील कोरोनाची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रानंतर (Maharashtra) देशातील इतर राज्यांमध्येही कोरोना व्हायरस (Coronavirus in India) वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक पार पाडली. यानंतर पंतप्रधानांनी या व्हरच्यूल बैठकीच्या माध्यमांतून सर्वांना संबोधित केले. यावेळी आपल्याला कोरोनाची दुसरी लाट लवकर थांबवावी लागणार आहे. त्यासाठी त्वरित आणि निर्णायक पावलं उचलली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. कोरोना थोपवण्यासाठी ‘Test, Track and Treat’ ही त्रिसुत्री वेळोवेळी वापरावी लागणार आहे असंही यावेळी पंतप्रधान म्हणाले. अर्थात चाचणी, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधणे आणि या सर्वांवर उपचार करण्याबाबत पंतप्रधानांनी भाष्य केले. पंतप्रधान असे म्हणाले की, ‘संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना कमीत कमी वेळात ट्रॅक करणे आवश्यक आहे आणि आरटीपीसीआर रेट देखील 70 टक्क्यांच्या वर राहणे आवश्यक आहे’. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
हमें छोटे शहरों में टेस्टिंग को बढ़ाना होगा।
— PMO India (@PMOIndia) March 17, 2021
हमें छोटे शहरों में "रेफरल सिस्टम" और "एम्बुलेंस नेटवर्क" के ऊपर विशेष ध्यान देना होगा: PM @narendramodi
(हे वाचा- मोठी बातमी! 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना लवकरच मिळणार कोरोना लस? ) शिवाय ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असण्याबाबात पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. ‘टिअर 2- टिअर 3 शहरांच्या आसपासचे क्षेत्र अधिक प्रभावित होऊ लागले आहेत, जे आधी प्रभावित नव्हते. आपण या लढाईल यशस्वी झालो कारण गावांना या आजारापासून आपण दूर ठेवू शकलो. पण आता टिअर2- टिअर 3 शहरात कोरोना पोहोचला तर गावात पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढला तर परिस्थिती सांभाळणे आपल्या यंत्रणेला कठीण जाईल’, असंही यावेळी ते म्हणाले. देशभरात प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणीचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. कोरोना लशीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘कोरोनाची लस जी आली आहे त्याची तारीख एकदा तपासून घ्या, लशीची एक्सप्रायरी डेट पाहून घेतली तर वापराबद्दल आपल्याला योग्य नियोजन करता येईल.’