मुंबई, 16 डिसेंबर : मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या राज्याचा विचार करायचं ठरवलं तर दरवर्षी लाखो विद्यार्थी राज्यसेवा आयोग अर्थात एमपीएससी (MPSC) परीक्षा देत असतात. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण खूप कमी असल्याने अलीकडे MPSC म्हणजे मृगजळ असल्याचेही बोलले जाते. यालाही अनेक कारणे आहेत. त्या खोलात आपल्याला जायचं नाही. मात्र, तुम्ही योग्य प्रकारे तयारी केली तर पहिल्या प्रयत्नात यश मिळवणारेही कमी नाहीत. आपल्या लेखातून याच संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहोत.
एमपीएससीचे स्वरुप
एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा याकडे जाण्याअगोदर आपण त्याचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. जे नव्याने या क्षेत्राकडे वळाले आहेत किंवा वळण्याचा विचार करत आहेत. अशांसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. ज्यांनी अभ्यास सुरू केला आहे. मात्र, अद्याप स्वरुप व्यवस्थित समजले नाही. त्यांच्यासाठीही हा लेखप्रपंच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे
1. एमपीएससी पूर्व परीक्षा
2. एमपीएससी मुख्य परीक्षा
3. मुलाखत
यात पूर्व परीक्षा (400 गुण), मुख्य परीक्षा (800 गुण) आणि मुलाखत (100 गुण) पूर्व परीक्षा ही पात्रता असते. मुख्य परीक्षेसाठीची चाळणी परीक्षा म्हणून पूर्व परीक्षा असते. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीस पात्र ठरवले जाते. आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे एकूण 800+100 = 900 गुणांपैकी उमेदवारांची अंतिम निवड केली जाते.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात लवकर करणे कधीही योग्य असल्याचे सांगितले जाते. एमपीएससी करण्याचा निर्णय तुम्ही जेव्हढा लवकर घ्याला तेव्हढा तो तुमच्यासाठी फायदेशीर आहे. ढोबळमानाने 12 वीनंतर तुम्ही या परीक्षेची पहिली अटेम्ट दिली तर तुम्हाला परीक्षेचा चांगला अंदाज येईल. यूपीएससीप्रमाणे (UPSC) एमपीएमसीला अटेम्टची कुठलीही मर्यादा नाही. त्यामुळे आपण जेवढ्या लवकर पहिला अटेम्ट देऊ तेवढ्या लवकर आपल्याला परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रमाचा आवाका या गोष्टी समजायला सोपे जाते.
परीक्षा पॅटर्न
सर्व परीक्षा नमुना, विषय, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांसाठी किती गुण आहेत, किती प्रश्न विचारले जातात या सर्वबाबी काळजीपूर्वक माहिती करुन घ्या. परीक्षेचा पॅटर्न एकदा लक्षात आला कि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करावी, कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे, प्रत्येक विषयाला किती दिवस वेळ द्यायचा याचे नियोजन करता येईल.
मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना सामान्य अध्ययन या विषयाच्या चारही पेपरचा अभ्यास आधी केल्यास मदत होते. मुख्य परीक्षेत 200 गुणांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेचा पेपर असतो. यामध्ये 100 गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा, तर 100 गुणांसाठी लेखी स्वरूपाचा पेपर असणार आहे. यापैकी या कालावधीत लेखी परीक्षेची तयारी योग्य प्रकारे करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये दोन्ही भाषांमधील निबंधलेखन, भाषांतर सारांश लेखन स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात.
सामान्य अध्ययनातील चारही पेपरमध्ये समावेश करण्यात आलेले विषय म्हणजे इतिहास, भूगोल, भारतीय संविधान व भारतीय राजकारण, मानवी संसाधन आणि मानवी हक्क, अर्थव्यवस्था व नियोजन, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास असा आहे. यामध्येच पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधील इतिहास, भूगोल, राज्यघटना अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान हे विषय समाविष्ट आहेत आणि अधिकचे म्हणून सामान्य विज्ञान, पर्यावरण व प्राचीन मध्ययुगीन इतिहास हे अभ्यासावे लागतात.
वेळ महत्वाची
परीक्षेचे स्वरुप समजून घेतल्यास वेळापत्रक करायला मदत होईल. मात्र, केलेलं वेळापत्रक पाळणेही तितकेच महत्वाचे आहे. विषय आणि प्रश्नांनुसार कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायला हवा याचं नियोजन करा. कारण, मुख्य परीक्षेत तुम्हाला 800 मार्कांसाठी लेखी पेपर लिहायचे आहे.
प्रशिक्षण आणि अभ्यास साहित्य
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेद्वारांमांध्ये दरवर्षी लाखोंची वा वाढ होत असते. परिणामी ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी भरपूर अभ्यासासोबत इतर प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, अभ्यास साहित्य यांचा उपयोग होतो. अनेक व्हाट्सअप ग्रुप्स देखील आहेत जे स्पर्धा परीक्षे संदर्भात माहितीची देवणाघेवाण करत असतात. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करुनही तुम्हाला परीक्षेसंदर्भात चांगली माहिती मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Mpsc examination, Upsc, Upsc exam