विराट कोहली
मुंबई, 10 सप्टेंबर**:** आशिया चषकातलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघातले खेळाडू मायदेशात दाखल झाले आहेत. पण यंदाच्या आशिया चषकात विराट कोहलीनं मात्र दोन अर्धशतकं आणि एक शतक ठोकून टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. आशिया चषकाआधी विराटनं एक महिना ब्रेक घेतला होता. फॉर्मशी झुंज देत असतानाच आशिया चषकात चांगली कामगिरी करण्याचा दबावही त्याच्यावर होता. पण या तो दबाव झुगारुन विराटनं दमदार परफॉर्मन्स दिला. आणि जवळपास तीन वर्षांनी शतकही साजरं केलं. विराटची पोस्ट चर्चेत… याचदरम्यान विराट कोहलीनं सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये विराटनं आफला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली त्यानं खाओ… पिओ… ऐश करो… पर किसी का दिल मत दुखाओ… असं कॅप्शन दिलंय. आता या पोस्टमधून विराटला नेमकं काय म्हणायचं हे कळत नसलं तरी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान त्यानं कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ धोनीनच आपल्याला मेसेज केला असं विधान केलं होतं. त्या विधानावरुन क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
लवकरच टी20 संघाची घोषणा दरम्यान आशिया चषकात विराटच्या दमदार प्रदर्शनानंतरही टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. पण आता भारतीय संघासमोर मोठं आव्हान आहे ते टी20 वर्ल्ड कपचं. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आशिया चषकात भारतीय गोलंदाजी तितकीशी प्रभावी ठरली नाही. त्यामुळे विश्वचषक संघात मोहम्मद शमीचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.