मेलबर्न, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला, पण भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. 31 रनवरच भारताने 4 विकेट गमावल्या होत्या, पण विराटने हार्दिकच्या मदतीने 113 रनची पार्टनरशीप केली. शेवटच्या ओव्हरचा थरार शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 16 रनची गरज होती. पहिल्याच बॉलला मोहम्मद नवाझने हार्दिक पांड्याला आऊट केलं. यानंतर बॅटिंगला आलेल्या दिनेश कार्तिकने एक रन काढून विराटला स्ट्राईक दिला. तिसऱ्या बॉलला विराटने पुन्हा दोन रन काढले. पुढच्या बॉलला विराटने सिक्स मारला, अंपायरने हा नो बॉल दिला, त्यामुळे भारताला 7 रन आणि फ्री हिट मिळाला. पुढच्या 3 बॉलमध्ये भारताला विजयासाठी 6 रनची गरज होती. फ्री हिटच्या बॉलवर मोहम्मद नवाझने वाईड बॉल टाकला. चौथ्या बॉलला भारताला बाईजच्या 3 रन मिळाल्या. पण पुढच्याच बॉलला दिनेश कार्तिक स्टम्पिंग झाला. यानंतर बॅटिंगला आलेल्या अश्विनला नवाझने पुन्हा वाईड बॉल टाकला, त्यामुळे भारताला विजयासाठी 1 बॉलमध्ये 1 रनची गरज होती. अश्विनने मिड ऑफच्या वरून शॉट मारत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 53 बॉलमध्ये 82 रनची नाबाद खेळी केली, तर हार्दिक पांड्या 37 बॉलमध्ये 40 रन करून आऊट झाला. पाकिस्तानकडून हारिस राऊफने 2 आणि मोहम्मद नवाझने 2 विकेट घेतल्या. नसीम शाहला 1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 159/8 वर रोखलं. अर्शदीप आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून इफ्तिकार अहमदकडून 34 बॉलमध्ये 51 आणि शान मसूदकडून 42 बॉलमध्ये 52 रनची खेळी करण्यात आली.