मुंबई, 8 एप्रिल : क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यात नेहमीच खुन्नस होती. सचिननं अनेकदा अख्तरची जोरदार धुलाई केली आहे. तर रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तरनं सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वेळा आऊट केले. अख्तर आयपीएल 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या मॅच दरम्यान तो चांगलाच अडचणीत सापडला होता. अख्तरनंच याबद्दलचा खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये 2008 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या मॅचमध्ये हा प्रकार घडला. त्या मॅचमध्ये कोलकाताची टीम पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 67 रन काढून ऑल आऊट झाली. मुंबईनं 68 रनचं टार्गेट 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्या मॅचमध्ये अख्तरनं सचिनला शून्यावर आऊट केले. अख्तरनं सचिनला आऊट करणे हे तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आवडले नाही. त्यांनी अख्तरला शिवीगाळ केली. गांगुली म्हणाला, ‘तुला लोकं मारतील’ सौरव गांगुली त्या सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन होता. शोएब अख्तरनं स्पोर्ट्सकीडाशी बोलताना ही आठवण सांगितली आहे. अख्तर म्हणाला, ‘प्रेक्षकांच्या संतापांमुळे गांगुलीनं माझी फिल्डिंगची जागा बदलली. आम्ही खूप कमी स्कोर केला होता. मॅच सुरू झाली त्यावेळी तिथं जबरदस्त वातावरण होतं. सचिनच्या मुंबईमध्ये मॅच होती. ती सचिन विरूद्ध शोएब अशी लढाई होती. ती मॅच पाहण्यासाठी शाहरूख खान देखील स्टेडिअममध्ये उपस्थित होता. मॅच सुरू होण्यापूर्वीच मैदान प्रेक्षकांनी गच्च भरले होते.’ अशी आठवण अख्तरनं सांगितली. IPL 2022 : भरवशाच्या खेळाडूनं दिला पंतला धोका, दिल्लीच्या पराभवात ‘ती’ चूक निर्णायक सचिनला आऊट करणे ही माझी सर्वात मोठी चूक होती, असंही अख्तर यावेळी म्हणाला. ‘मी सचिनला पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केलं. ती माझी सर्वात मोठी चूक होती. मी फाईन लेगला फिल्डिंग करत होता. मला प्रेक्षकातून मोठ्या प्रमाणात शिव्या दिल्या जात होत्या. त्यावेळी गांगुलीनं मला मिड विकेटवर फिल्डिंगसाठी बोलावले. हे लोकं तुला मारतील. तुला सचिनला मुंबईमध्ये आऊट करायला कुणी सांगितलं होतं? असा प्रश्न मला गांगुलीनं विचारला.’ असंही अख्तर यावेळी म्हणाला.