बीड, 29 जुलै: अधिक मास हा धार्मिक व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. दान धर्म, धार्मिक विधी, पूजा पाठ या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असतात. धोंडा महिना, पुरुषोत्तम मास या नावांनीही हा महिना ओळखला जातो. भगवान पुरुषोत्तमाची पूजा या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असते. भारतातील एकमेव असणारं पुरुषोत्तमाचं मंदिर महाराष्ट्रात असून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सध्या भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. अधिक महिन्यात भरते यात्रा अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणूननही ओळखले जाते. हिंदू धर्मात या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेचे मह्त्त्व आहे. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात अधिक मासात यात्रा भरत असते. राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येत असतात.
काय आहे मंदिराचा इतिहास? प्रत्येक गाव खेड्यात विविध देव देवतांची मंदिरे असतात. मात्र, भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर संपूर्ण भारतात एकच असल्याचं सांगितलं जातं. बीड जिल्ह्यातील माजलगावहून 22 किलोमीटर अंतराव पुरुषोत्तम पुरी हे गाव आहे. या गावात हे मंदिर आहे. गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराचे बांधकाम सुमारे 1500 वर्षांपूर्वी झाल्याचा शिलालेख येथे आहे. या मंदिराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदिर (उत्तराखंड) पध्दतीची आहे. शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे. ही दोन्ही मंदिरे जुनी असल्याचे दिसते. वृंदावनातील मंदिराची प्रतिकृती वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून मुर्ती मनमोहक अशी आहे. हे मंदीर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगतात. तर मंदिरातील गरुडध्वजा पंढरपूर येथील मंदिराची आठवण करून देतात, असे भाविक सांगतात. मेष राशीसाठी कसा जाणार ऑगस्ट? ‘या’ तारखेनंतर होईल दडपण कमी! काय आहे आख्यायिका? या मंदिराची आख्यायिका अशी की, पूर्वी शार्दुल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत होता. भगवान विष्णू यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला. ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले म्हणून आज देखील हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक्रतीर्थवर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात, असे मंदिराचे अध्यक्ष विजय गोळेकर सांगतात.