पुणे, 25 जानेवारी : आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असून महाविकासआघाडीसोबत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी सोमवारी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी आपण महाविकासआघाडीसोबत युती करण्यास उत्सूक असल्याचं म्हणलं होतं, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केलं का? असा प्रश्न विचारला जात आहे. वंचित आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सरकारही आणू शकतो, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना-वंचितच्या युतीची घोषणा केली होती. तसंच प्रकाश आंबेडकर महाविकासआघाडीचा भाग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
शिवेसना-प्रकाश आंबेडकर यांची युती झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने सावध प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे काय प्रस्ताव ठेवला याबाबत आम्हाला समजलं की आम्ही आमचा प्रस्ताव देऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. शिवसेना-वंचितच्या युतीनंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वंचित आणि शिवसेनेची युती होणार असेल तर जागावाटपामध्ये वंचितला शिवसेनेच्या कोट्यातल्या जागा देण्यात याव्यात, असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.