Delhi: Prime Minister Narendra Modi waves as he arrives for an interactive session-'Pariksha Par Charcha' with school and college students at Talkatora Stadium in New Delhi, on Friday. PTI Photo by Manvender Vashist (PTI2_16_2018_000170B)
नवी दिल्ली 18 जानेवारी : सगळ्या विद्यार्थ्यांना आता परिक्षांचे वेध लागले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासून सगळ्यांच्या परिक्षांना सुरुवात होत असते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. 20 जानेवारीला राजधानी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. 16 फेब्रुवारी 2018 ला पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला होता. यावर्षीचा कार्यक्रम हा या उपक्रमातला तीसरा कार्यक्रम ठरणार आहे. परिक्षेला जातांना काय काळजी घ्यावी? या काळात येणाऱ्या ताण- तणावाचं व्यवस्थापन कसं करावं? परिक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा? पालकांची भूमिका आणि भविष्याचं नियोजन अशा सगळ्याच विषयांवर ते विद्यार्थ्यांशी हितगुज करणार असून पालकांनाही सल्ला देणार आहेत. डिसेंबर महिन्यातच पंतप्रधानांनी ट्विटरवरून या कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्याच बरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एक परिक्षेचीही घोषणा केली होती. 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा होती. या परिक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना 20 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहायला मिळणार आहे. या परिक्षेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने MyGov या सरकारच्या वेबसाईटनरून ही परिक्षा घेतली होती. त्यात विद्यार्थ्यांना विविध 5 विषय देण्यात आले होते. त्यावर 1,500 शब्दांमध्ये निबंध लिहून पाठवायचा होता. सगळीच प्रोसेस ऑनलाईन ठेवण्यात आली होती. या परिक्षेसाठी 3 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातले 2 हजार विद्यार्थी हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.