19 मार्च : एके काळी देशात शरद पवारांचा दबदबा होता; पण आता त्यांना उमेदवार सापडत नाही हे दुदैर्व आहे. राष्ट्रवादीची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.’ असं उद्धव म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेत चौफेर फटकेबाजी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ही उद्धव जोरदार बरसले. निवडणुका जशा जवळ येतायेत तसे राजकारणी आणखी आक्रमक होतायेत.
नार्वेकर हे राष्ट्रवादीचे जावई होते आता घरजावई झाले
त्यांना जेव्हा आताच राष्ट्रवादीत गेलेले राहुल नार्वेकरांबाबत विचारलं, तेव्हा, ‘शिवसेना फुटली नाही’ असं ते म्हणाले. शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेणार्या राहुल नार्वेकरांवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. ‘नार्वेकर हे राष्ट्रवादीचे जावई होते आता घरजावई झाले. राष्ट्रवादीला मावळमधून उमेदवार मिळाला नाही. म्हणून राहुल नार्वेकरांना मावळमधून उमेदवारी दिली. राष्ट्रवादी हा गद्दारांचा पक्ष आहे,’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
गडकरींच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही
शेखर सावरबांधे यांनीही लोकसभा लढविणार नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात शिवसेना नागपूरमध्ये अपक्ष उमेदवार उतरवणार अशी चर्चा होती त्यावर,‘गडकरींबाबत सगळे गैरसमज दूर झाले आहेत. मोदींच्या काही सभांना मी जाईन’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘बहुजन समाज पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर आली होती. मात्र, आमच्यावर शिवसेनाप्रमुखांचे संस्कार आहेत. आम्ही महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या सोबत आहोत. आम्ही गडकरींच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही’, असं उद्धव म्हणाले.