ट्रेन अपघात
बालासोर : ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर काळानं झडप घातली आणि एक दोन नाही तर तब्बल 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या 233 झाली असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढत आहे. अपघातस्थळावरुन मिळालेल्या अहवालात हा आकडा 233 वर पोहोचली आहे. जखमींची संख्या 900 च्या आसपास आहे. ओडिशाच्या बालासोर इथे काल संध्याकाळी एक प्रवासी ट्रेन दुसर्या ट्रेनच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांवर आदळल्याने हा भयंकर अपघात झाला.
ओडिशातील बालासोर येथे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आणि विरुद्ध रुळावर पडले. त्यामुळे यशवंतपूरहून हावडाकडे जाणाऱ्या आणखी एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला.
त्यातील तीन ते चार डबे रुळावरुन घसरले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री म्हणाले की, ‘अपघात दुर्दैवी होता, आणि त्यांच्या मंत्रालयाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले.’ एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचावासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले.