नवी दिल्ली, 15 मे : देशात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. देशभरात यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये राहणारी 35 वर्षांती रुखसार अपार्टमेंटमध्ये जेवण बनवायचं काम करायची. आता त्याच अपार्टमेंटबाहेर ती पालेभाज्या विकायचं काम करते. लॉकडाऊनमुळे तिचं काम बंद झालं. रुखसार म्हणते की, सरकारी रेशनच्या लाइनमध्ये थांबण्यापेक्षा कष्ट करून भाजी विकणं आणि सन्मानाने राहणं कधीही चांगलं. रुखसारप्रमाणेच दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या फैजानवरही नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. ग्रॅज्युएट असलेला फैजान याआधी डीएलएफ सायबर हब मॉलमध्ये काम करत होता. त्याला महिन्याला 16 हजार रुपये मिळायचे पण मॉल बंद झाल्यापासून वेतनही मिळाले नाही. हातातलं काम गेल्यानंतर फैजानने भावाकडून 5 हजार रुपये उधार मागून घेतले. त्यानंतर बाजारातून आंबा आणि टरबूज खरेदी केले. आता तो दिल्लीतील रस्त्यावर एका ठिकाणी या फळांची विक्री करतो. यातून तो महिन्याचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. हे वाचा : क्वारंटाईन स्टॅम्पचा लहान मुलांच्या त्वचेवर परिणाम, हातावर झाल्या जखमा फैजानने एनडीटीव्ही शी बोलताना सांगितलं की, सरकारकडून दोन वेळचं जेवण मिळेल पण रूम भाडं आणि मुलांची फी, पुस्तकांच्या खर्चाचे काय? दिल्लीत पराठे बनवणारं एक प्रसिद्ध हॉटेल आहे. त्याचे मुख्य आचारीसुद्धा आंबे विकण्याचं काम करत आहेत. दिल्लीत आता प्रत्येक चौकात असे अनेक फळविक्रेते आहेत ज्यांनी बेरोजगारीमुळे हा मार्ग निवडला आहे. हे वाचा : हॉटेलमध्ये पुतळ्यांनी बुक केल्या खुर्च्या; निम्म्या खुर्च्यांवरच माणसं बसणार