फाईल फोटो
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : सध्या देशभरात हवामानामध्ये बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला आहे. अशातच काही ठिकाणी अवकाळी पाऊसदेखील पडला आहे. हवामानातील या बदलांमुळे अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लागण झाली आहे. ही लक्षणं एच3एन2 एन्फ्लुएन्झाची असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोविड-19च्या सह-संसर्गाशी संबंधित एच3एन2 एन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे आरोग्य अधिकारी चिंतेत आहेत. आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं तज्ज्ञांनी चाचण्या वाढवण्याची सूचना आरोग्य यंत्रणांना केली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एका शास्त्रज्ञाच्या हवाल्यानं मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 आणि एन्फ्लुएन्झाची लक्षणं सारखीच आहेत आणि ती दोन ते तीन महिने टिकू शकतात. सोबतच त्यांचा प्रसारही सुरू असतो. एका उच्च अधिकार्यानं मिंटला सांगितलं की, एन्फ्लुएन्झाच्या प्रकरणांची संख्या वाढत असताना शास्त्रज्ञांनी कोविड चाचणीच्या संख्येत वाढ करण्याची शिफारस केली आहे. अधिकारी म्हणाला, “निरीक्षण आणि चाचणी वाढवण्यासाठी सरकारनं ताबडतोब ‘एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रम’ सुरू करण्याचे निर्देश दिले पाहिजेत.” इन्स्टिट्युट ऑफ इंटरनल मेडिसीन एज्युकेशनचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी एएनआयला सांगितलं की, एच3एन2 विषाणू हा एच1एन1 विषाणूचं म्युटेशन आहे. तो दरवर्षी याच काळात पसरतो. त्यांच्या म्युटेशनमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. गुलेरिया असंही म्हणाले, “आम्ही हेदेखील पाहतो की, वर्षाच्या या काळात जेव्हा हवामान बदलतं, तेव्हा एन्फ्लुएन्झा होण्याची शक्यता जास्त असते. सध्या आपण नॉन-कोविड काळात परत आलो आहोत. आपण आता मास्क वापरत नाही शिवाय गर्दीचेदेखील नियम पाळत नाही. यामुळे एन्फ्लुएन्झा विषाणू अधिक सहजपणे पसरत आहे.” Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी प्या हे एक ड्रिंक, शरीराला होतात अनेक फायदे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (आयसीएमआर) संपूर्ण भारतातील 30 व्हायरल रिसर्च आणि डायग्नॉस्टिक प्रयोगशाळांमध्ये रेस्पिरेटरी सर्व्हिलन्स सुरू केला आहे. दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी मिंटला दिलेल्या माहितीनुसार, एन्फ्लुएन्झा विरूद्ध लसीकरण केलं जात असतानाही, एच3एन2 प्रकरणांसह एडेनोव्हायरस, पॅरा एन्फ्लुएन्झा आणि कोविड-19 संसर्गाचे रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होत असल्याचं आढळलं आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ही प्रकरणं जास्त गंभीर नाहीत. एच3एन2 प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर्दी-खोकल्याचा त्रास असल्यास शक्यतो घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे किंवा मग मास्कचा वापर केला पाहिजे. या व्यतिरिक्त घरच्याघरी गोळ्या न घेता एकदा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे.