नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाखांहून अधिक झाल्याचं पाहायला मिळालं. 10 ऑगस्टआधीच एवढ्या मोठ्या संख्येनं कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जुन्या ट्वीटचा हवाला देत राहुल यांनी लिहिले की देशात कोरोनाची आकडेवारी 20 लाखांच्या पुढे गेली असून केंद्रातील मोदी सरकार मात्र गायब झालं आहे.
हे वाचा- डोनाल्ड ट्रम यांचा चीनला दणका! अमेरिकेत tiktok आणि Wechat वर बंदी राहुल गांधींनी 17 जुलैला एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी कोरोनाचा आकडा 10 लाख पार केल्याचा उल्लेख केला होता. याशिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलायला हवीत असंही राहुल गांधींनी ट्वीट केलं होतं. 10 ऑगस्टआधीच पुन्हा एकदा देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाखहून अधिक असल्याचं समोर आल्यानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख पार केला आहे. त्यामध्ये 13 लाख 70 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 41 हजाहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.