नवी दिल्ली, 25 मार्च : भारतातील (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाव्हायरसची एकूण आकडेवारी जारी केली आहे. एकूण 606 प्रकरणांपैकी 553 प्रकरणं अॅक्टिव्ह आहेत, तर 42 रुग्ण बरे झालेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबईत 9, ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर सांगलीत एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. तर राज्यातील पहिले 2 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा - राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 15 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 122 वर कोरोना विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा सावध केलं आहे. सर्व देश कोरोनाविरुद्ध युद्ध लढत असून देशावासियांनी त्यात सहभाग घेतला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मंगळवारी बोलताना त्यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा लोकांना त्या 21 दिवसांची आठवण करून दिली आहे. आपण 21 दिवस जर घराबाहेर प़डलो नाही तरच आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्याचा हाच एकमेव मंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकण्याचा पंतप्रधान मोदींनी सांगितला मंत्र, फक्त एवढीच काळजी घ्या!