घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
भास्कर मेहरे, यवतमाळ, 22 जुलै : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांचे पाणी घरात शिरल्याने घरांची पडझड झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात वाघाडी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. वाघाडी गावात पहाटे पावसाचे पाणी शिरले. यावेळी घराची भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ शहराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे नदी नाल्याला पूर आल्याने पाणी गावात शिरले. यवतमाळ शहराला लागून असलेल्या वाघाडी गावात पहाटे दरम्यान पावसाचे पाणी शिरले. काही नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. गावातील काही धाडसी युवकांनी धाव घेत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. तर, घराची भिंत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. उशिरा पर्यंत बचाव पथकाचे कुणीही न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्यांचे नाथ होणार मुख्यमंत्री शिंदे, घेतला मोठा निर्णय नदीकाठच्या गावातील १०० ते १५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वाघाडी गावातील ५० हून अधिक घरांचे नुकसान झालेय. तर काही जनावरे सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. यवतमाळमधील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.