तुषार कोहळे/ नागपूर, 10 मार्च : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या महादुला येथील तरुण शेतकरी रामेश्वर शिवचरण केळेकार यांनी (वय 30) कृषी कर्ज व नापिकी तसेच विकलेले धानाचा चुकारा वेळेवर न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रामेश्वर यांचं लग्न ठरलं होतं, मात्र आर्थिक टंचाईमुळे लग्न कार्य कसं हाेणार या विंवचनेतुन शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. (Young farmer commits suicide in Vidarbha before marriage) यासंदर्भात कुटुंबीयानी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर व आई असे दाेघेच महादुला येथे राहत हाेते. 2013 रोजी त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने कुटुंबाला रामेश्वर घर सांभाळत होता. नुकतेच त्यांचे लग्न ही जुळले हाेते. यावर्षी दुबारपेरणीमुळे कापसाचे पिक हातचे गेले. त्यात धान्याचेही उत्पादन कमीच झाले. एक महिण्यापुर्वी त्यांनी धान आदिवासी विकास महामंडळाला विकला हाेता. मात्र त्या पिकाचा 50 हजार रुपयाचा चुकाराही त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यांच्यावर यूनियन बँकेचे दीड लाखांचे कर्ज हाेते. सोबतच गाेल्डचे कर्ज ही 30 हजार रुपयांपर्यंत होते. याशिवाय बचत गटाचेही 30 हजारांचे कर्ज हाेते. सततच्या नापिकीमुळे रामेश्वर सतत चिंतेत होते. लग्नाचा खर्च कसा करावा याची त्यांना चिंता हाेती. या चिंतेत असताना एकेदिवशी ते शेतात गेले व झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याची माहिती त्यांच्या आईला कळताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला व त्या बेशुध्द पडल्या. हे ही वाचा- नागपूरात कोरोनाचा उद्रेक; सलग चौथ्या दिवशी चिंता वाढवणारी बातमी सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रामेश्वर यांना तीन बहिणी व एक भाऊ आहे. ताे काेहळी कळमेश्वर तालुका येथे मजुरीचे काम करताे. या घटनेनंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनंतर परत एकदा विदर्भातील ग्रामीण भागाचे विदारक चित्र पुढे आले आहे. तरुण शेतकरी मोठ्या उत्साहाने शेती करतात मात्र सततची नापीकी आणि निसर्गाचा प्रकोप हा या तरुण शेतकऱ्यांचा उत्साह कमी करतो व त्यांना नैराश्याच्या खाईत ढकलतो.