भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी ठाणे, 1 जून : आपलं दुचाकी किंवा चारचाकी वाहन इतरांपेक्षा हटके दिसावी हा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी काही जण स्वत:च्या मर्जीनं गाडीमध्ये बदल करतात. कधी सायलेन्सर तर कधी गाडीचा आकारच बदलतात. तुम्ही देखील असे परस्पर बदल करत असाल तर सावधान! तुम्हाला हे प्रकार महाग पडू शकतात. काय होणार कारवाई? ठाण्याच्या उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन उत्पादक तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम कलम 126 नुसार ज्या मान्यता प्राप्त संस्था आहेत त्या संस्थांनी मान्यता दिलेल्या पार्टस व्यतिरिक्त इतर कोणतेही पार्टस वाहनांना वापरण्याची परवानगी नाही. वाहनांमध्ये तसा कोणताही बदल करायचा असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. वाहनांचे इंजिन, तसंच कोणताही पार्ट बदलताना नोंदणी प्राधिकरणाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. विना परवानगी हे प्रकार केले तर वाहन चालकाला 2000 रुपये दंड भरावा लागतो.'
‘तरुणाईमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवण्याची क्रेझ असते. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे वायू तसंच ध्वनी प्रदुषण होते. या प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारीच नाही तर वाहतूक शाखा देखील कारवाई करू शकते,’ असं पाटील यांनी सांगितलं. का परवानगी आवश्यक? सध्या मोटार सायकल इलेक्ट्रॉनिक करण्याकडं तरुणांचा कल वाढला आहे. हे करताना कोणत्याही तांत्रिक गोष्टीची पडताळणी केली जात नाही. प्रादेशिक परिवहन मंडळाची पूर्व परवानगी घेतली तर इंजिनियर असलेले अधिकारी या सर्व गोष्टींची पडताळणी करतात. कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी ही पडताळणी केली जाते, असं त्यांनी स्पष्ट केले. आता उलगडणार 20 कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास, विदर्भाच्या जमिनीत सापडला मोठा खजिना! Video प्रवासी वाहनं किंवा खाजगी बसेसच्या आसन क्षमतेवर कर भरावा लागतो. खाजगी बसची ही आसन व्यवस्था बदलायची असेल किंवा आसन व्यवस्थेत वाढ करायची असेल तरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पूर्व परवानगीनेच ही आसन व्यवस्था बदलता येते. एखाद्याने ही परवानगी घेतली नाही तर त्याला दंडाची रक्कम भरावी लागते, असं पाटील यांनी सांगितलं.