मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. यामध्ये भाजप - शिवसेना महायुतीला 167 जागा मिळण्याची चिन्हं आहेत. या घडामोडींमध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये निम्मी मंत्रिपदं शिवसेनेला हवी आहेत. शिवसेनेने, अडीच - अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाची अट घातली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये निम्म्या कालावधीसाठी शिवसेना आणि निम्म्या कालावधीसाठी भाजपचा मुख्यमंत्री असेल, असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपला मागच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या. याउलट शिवसेनेचं मात्र नुकसान झालं नाही, असं चित्र आहे. यामुळेच शिवसेनेने भाजपसमोर अटीशर्ती ठेवल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. (हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका, शिवसेनेचं नुकसान नाही) मागच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आधी शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं नव्हतं. पण नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेतलं. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ कोण यावरून प्रत्येक निवडणुकीत स्पर्धा पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. ============================================================================= LIVE VIDEO : नितेश राणे जिंकले, सेनेला टोला लगावत निलेश यांनी केला जल्लोष