साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर 24 एप्रिल : शेतकरी राजा आपल्या देशासाठी दिवसरात्र शेतात कसत असतो. मात्र कधी कधी आपल्या घरच्या मंडळींसाठी देखील शेतात पीक उगवावे लागते. कोल्हापुरात असेच एक उदाहरण समोर आले आहे. आपल्या घरी शुद्ध, स्वच्छ आणि कमी खर्चिक तेल मिळावे, यासाठी आपल्या शेतात ऊस पिकाऐवजी सूर्यफुलाची शेती पिता-पुत्रांनी केली आहे. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे या गावी 92 वर्षांचे शेतकरी आजोबा रंगराव रामचंद्र खाडे राहतात. स्वतः ह.भ.प. रंगराव खाडे आजोबा, त्यांचा मुलगा तानाजी खाडे, नातू राहुल खाडे हे त्यांच्या 7 एकर शेतात शेती करतात. पण सध्या त्यांचे शेत पिवळ्या जर्द सूर्यफुलांनी बहरले आहे. खरंतर या विभागात सर्वत्र उसाचे पीकच घेतले जाते. मात्र आपल्या घरी लागणाऱ्या खाद्यतेलाची गरज भागवणे आणि बाजारात महाग आणि भेसळयुक्त मिळणारे तेल विकत घेण्याचे टाळणे, या कारणांसाठी त्यांनी पारंपारिक ऊसशेती ऐवजी यंदा हे सूर्यफुलाचे पीक त्यांच्या एक एकर क्षेत्रात घेतले आहे. गावच्या जवळच काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्या नजीक त्यांचे हे शेत आहे.
सध्या बाजारात सध्या भुईमुग, सूर्यफुल या तेलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मात्र इतक्या दराने विकत घेतलेले तेल हे देखील भेसळ विरहित असेल, याची खात्री बऱ्याचदा कोणीच देऊ शकत नाही. तर खाडे यांचे कुटूंब मोठे आहे. घरची तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी खाडे कुटुंब डोंगरपट्ट्यावर भुईमुग घेते. मात्र हे कुटुंबासाठी पुरेसे पडत नव्हते. त्यामुळेच घरी तेल विकत आणण्याऐवजी हे असे आपल्याच शेतात सूर्यफुल उगवून तेल मिळवण्यासाठी कुटुंबाने अशी शेती केली आहे. कशी केलीय शेती खाडे यांचे 7 एकरचे शेत आहे. यापैकी एक एकरमध्ये त्यांनी हे सूर्यफूल उगवले आहे. शेतात त्यांनी उभी-आडवी दोन वेळा नांगरट केली आहे. तर या एक एकर क्षेत्रात 21 ट्रॅक्टरट्रॉली शेणखत टाकण्यात आले आहे. त्यानंतर ट्रक्टरद्वारे रोटरने मशागत केली आणि दोन फूटांची सरी सोडून सुर्यफुल टोकणले. तर पिकासाठी सुफला, युरिया, सुफर फास्फेट ही खते देखील वापरली आहेत. मात्र शेणखत अधिक वापरले असल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारची औषध फवारणी केलेली नसल्यामुळे सुर्यफुलाचे पीक चांगल्या पद्धतीने बहरून आले आहे, असे शेतकरी तानाजी खाडे यांनी सांगितले आहे.
Sangli News: अशी स्मशानभूमी तुम्ही पाहिलीच नसेल; इथं येताच वाढतं लोकांचं ‘ज्ञान’, पाहा Video
वय 92, मात्र आजही तरुणच रंगराव खाडे यांचे वय 92 वर्षे आहे. मात्र आजही ते अतिशय बळकट आहेत. रोज त्यांची शेतात हजेरी असते. शेतात पिकाला नीट पाणी देणे, शेतीची मशागत करणे अशी कामे देखील रंगराव आजोबा नित्याने करतात. इतक्या वयात शेतीकाम करताना त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असाच असतो. असे तेल आरोग्यासाठी उत्तमच बाजारातून चढ्या दराने विकत आणलेले तेल हे शंभर टक्के चांगले असण्याची खात्री नसते. त्यामुळे अनेक वर्षे आम्ही डोंगरपट्ट्यावर भुईमूग घेतो. पण ते घरी पुरेसे होत नसल्यामुळे वर्षभर पूरेल एवढे पिक आता घेतले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे घरी सुर्यफुल पिकवून तेल वापरले तर आपल्याबरोबर घरच्यांचे देखील आरोग्य चांगले रहाते, असे रंगराव खाडे यांनी सांगितले.