कोल्हापूर, 26 जुलै : सध्या राज्यभरात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर अनेक भागात गेल्या दोन दिवसांत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. तसेच पुढील बारा दिवस राज्यात मुसळधार पवासाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अशा वेळी हवामान विभागातर्फे जे वेगवेगळे अलर्ट जारी केले जातात. अनेकांना त्या अलर्टचा अर्थ काय असतो, हे देखील माहीत नसते. तर अशा अलर्टसच्या वेळी नेमकी काय काळजी घेतली जावी, हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी हवामान खात्याकडून देण्यात येणाऱ्या या अलर्टबाबत माहिती दिली आहे. पावसाच्या अंदाजावरून दिले जातात अलर्ट भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून म्हणजेच IMD कडून विविध भागात पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. याच पार्श्वभूमीवर कमी अधिक पावसानुसार वेगवेगळे अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात येत असतात. तर यावेळी नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने रंगांवर आधारित चार वेगवेगळ्या रंगांचे अलर्ट जारी केले जातात. त्याच्यामध्ये ग्रीन म्हणजे हिरवा, यलो म्हणजे पिवळा, ऑरेंज म्हणजे नारंगी आणि रेड म्हणजे लाल अशा चार अलर्टचा समावेश असतो.
कधी दिले जातात वेगवेगळे अलर्ट? ग्रीन अलर्ट - ज्यावेळी एखाद्या जिल्ह्यात किंवा एखाद्या भागात ग्रीन अलर्ट दिला जातो. तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडेल, असा त्याचा अर्थ होतो. यलो अलर्ट - जेव्हा जिल्ह्यात साधारणपणे 65 ते 115 मीटर या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असते, तेव्हा यलो अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट - ऑरेंज अलर्ट म्हणजे साधारणपणे 115 ते 204 मिलीमीटर दरम्यान पाऊस होऊ शकतो. रेड अलर्ट - रेड अलर्ट म्हणजे 204 पेक्षाही जास्त प्रमाणातील पावसाची शक्यता असणे. उदाहरणादाखल 2021 च्या पावसाळ्याचा जर विचार केला तर तेव्हा कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. त्या वर्षी 23 जुलै या एकाच दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे रेड अलर्टचा पाऊस झालेला होता. 24 तासात तब्बल 212 मिलीमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद त्यावेळी झाली होती, असे प्रसाद संकपाळ यांनी सांगितले आहे. काळ्या पाठीचे खेकडे कधी खाल्ले का? कोल्हापुरात भरलाय बाजार, किंमत ? अलर्टस् वेळी नागरिकांनी घ्यावी ही काळजी.. ग्रीन अलर्ट - जेव्हा भारतीय हवामान खात्याकडून आपल्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला असेल, तर फारशी काळजी करण्यासारखे काही कारण नाही, असा त्याचा अर्थ होतो. सर्वसामान्य प्रमाणात अर्थात 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडेल, असेही त्यावरून सूचित केले जाते. यलो अलर्ट - 65 ते 115 मिलिमीटरच्या दरम्यान पडणारा पाऊस म्हणजे यलो अलर्ट वेळी आपण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल, तर प्रवास करणे शक्यतो टाळावे. जर अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असाही त्याचा अर्थ असतो. ऑरेंज अलर्ट- ऑरेंज अलर्ट वेळी साधारणपणे 115 ते 204 मिलिमीटर च्या दरम्यान पाऊस असतो. म्हणजेच अति अतिवृष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते. या कालावधीमध्ये सातत्याने प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचा पालन करणे, नागरिकांनी अत्यंत आवश्यक असते. रेड अलर्ट- रेड अलर्ट जर आपण विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अति अति अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये होऊ शकते, असा त्याचा अर्थ होतो. या कालावधीत प्रशासनामार्फत वेळोवेळी दर तासाला प्रसार माध्यमांच्या मदतीने किंवा वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने जास्तीत जास्त सूचना सामान्य नागरिकांना दिल्या जातात. त्या सूचनांचे सर्वांनी पालन करणे अत्यंत गरजेचेच असते. दरम्यान, या कोणत्याही अलर्टवेळी अनपेक्षितपणे काही अघटित घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच नागरिकांनी सतर्क राहून स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्यावी, असेही संकपाळ यांनी स्पष्ट केले आहे.