मुंबई, 20 एप्रिल: राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) कडून लागू करण्यात आलेले निर्बंध अधिकाधिक कठोर केले जात आहेत. आताच मिळालेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र सरकारने सध्या सुरू असणाऱ्या निर्बंधाच्या गाइडलाइन्समध्ये काही बदल केले आहे. नवीन आदेशानुसार आता किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू राहणार आहे. राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, सर्व खाद्य दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री , फिश यासह), कृषि उत्पादनाशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकानं, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं देखील दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. (हे वाचा- COVID-19: RT-PCR चाचणी नेगिटिव्ह, तरीही आहे कोरोना पॉझिटिव्ह येण्याची भीती ) मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ (Break the Chain) मोहिमेअंतर्गत 20 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच मोहिमेअंतर्गत सरकारने आता नवी गाइडलाइन जारी केली आहे. सरकारच्या या गाइडलाइन्सबाबत बोलताना पुन्हा एकदा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार पूर्णपणे भांबावले असल्याची टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘सरकार पूर्णपणे भांबावले आहे. 4 तासात सगळी गर्दी एकवटणार आहे. त्या गर्दीचं नियोजन काय आहे याचा उल्लेख या नोटिफिकेशन नाही आहे. घरपोच माल पोहोचवण्याची व्यवस्था हवी होती. यामुळे दुकानदारही नाराज होणार आहेत.’