मुंबई, 13 फेब्रुवारी: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे धुमसत असल्याचं चित्र आहे. मग तो महाविद्यालयांच्या परीक्षांचा मुद्दा असो वा कंगना राणौतचं प्रकरण असो. आता सरकारी विमानाच्या प्रवासावरुन आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी पालघरला जाताना राजभवनातील नेहमीचं हेलिपॅड वापरण्याऐवजी ठाकरे यांनी हेलिपॅडची जागा बदलली आहे. यावेळी त्यांनी महालक्ष्मी रेसकोर्स येथून उड्डाण केलं आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अलीकडेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड दौऱ्यावर चालले होते, तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांना सरकारी विमान नाकारलं होतं. त्यानंतर सरकार आणि राज्यपाल असा वाद सुरू होताना दिसला. अशातच मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी राजभवनातील नेहमीचं हेलिपॅड वापरण्याऐवजी रेस कोर्स वापरल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, राजभवनाचं हेलिपॅड न वापरण्याचं अद्याप कोणतंही कारण समोर आलं नाही. त्यांनी पुढे असंही सांगितलं आहे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी प्रकरणाचा या कारवाईशी काहीही संबंध नाही. (वाचा - Shaheen Bagh : फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ) नेमकं प्रकरण काय होतं? महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी गुरुवारी आपल्या मूळ उत्तराखंड राज्यात जाणार होते. या प्रवासासाठी ते विमानतळावर पोहोचताच त्यांना अद्याप विमान मंजूर झालं नसल्याचं सांगण्यात आलं. त्यांनंतर त्यांना खाजगी विमानाने प्रवास करावा लागला. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं. भाजपने राज्य सरकारवर केला हल्लाबोल राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयाचं वर्णन ‘बालिश’ असं केलं आहे. गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने राजभवनच्या अधिकाऱ्यांवर राज्यपालांना माहिती न पुरवल्याचा आणि प्रवासासाठी उपाययोजना न केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण आता अजून पेटताना दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.