अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 9 जून : राज्यात आता सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. त्यामुळे सध्या राज्यामध्ये शेतकरी हे मान्सूनपूर्व कापसाची लागवड करत आहेत. पण मान्सूनपूर्व कापसाची लागवड करू नये असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केल्यामुळे पिकांना धोका उद्भवू शकतो. त्याचबरोबर उत्पन्न चांगले होण्याची शक्यता नसते, असं छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाने सांगितले आहे. कधी करावी लागवड? येणाऱ्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सून नंतरच कापसाची लागवड करावी. यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये धोका होणार नाही. त्याचबरोबर उत्पन्न सुद्धा चांगले होईल. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केल्यामुळे बोंड आळीचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो आणि गेल्या चार-पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सुद्धा सहन करावे लागलेले आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पाऊस पडल्यानंतरचं लागवड करावी. Jalna News : शेतकऱ्यांनो, बियाणे आणि खत खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी करा ‘हे’ काम, कृषी विभागानं दिला महत्वाचा सल्ला Video कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बीटी वाणाचा वापर करावा. बाजारामध्ये अनेक कंपन्यांची बीटी वाण उपलब्ध आहेत. मान्सून कधी दाखल होणार आहे किंवा उशिराने होणार आहे या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी लागवड करावी. जर मान्सून उशिराने दाखल झाला तर शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे वाण निवडून कापसाची लागवड करावी. सर्व शेतकऱ्यांनी 15 जुलैच्या आतमध्येच कापसाची लागवड करावी. त्यानंतर जर लागवड केली तर उत्पन्न कमी प्रमाणात होईल, असं कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर रमेश जाधव यांनी सांगितले आहे.