बीड, 26 जून: पावसाळ्यात विजेच्या तारा तुटल्याने किंवा विजेच्या धक्क्याने अपघातांचे प्रमाण अधिक असते. विजेचे खांब, तारा वेळेत दुरुस्ती न केल्यास अशा अपघातांचा धोका संभवतो. त्यामुळे बऱ्याचदा महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जाते. आता राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. बीडमध्येही लवकरच पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज पुरवठा करणाऱ्या उपकरणांची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तात्काळ दुरुस्तीची मागणी होत आहे. वादळी वारा आणि पावसात धोका पावसाळ्यात विजेचे खांब आणि तारांना वादळी वाऱ्याचा धोका अधिक असतो. वादळी वाऱ्यात उच्च दाबाच्या तारा तुटण्याचा, खांब पडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यासाठी मान्सून सुरू होण्यापूर्वीच योग्य ती दुरुस्ती करण्याची गरज असते. वीज बिल वसुलीसाठी तगादा लावणारे महावितरण अशावेळी दूर्लक्ष करते. बीडमध्ये तशा घटना घडलेल्या असतानाही महावितरणने त्यातून बोध घेतलेला दिसत नाही, अशी नागरिकांची भावना आहे.
गजबजलेल्या ठिकाणी विद्युत रोहित्र उघडे बीड शहरामध्ये महावितरणच्या दुर्लक्षामुळे गजबजलेली ठिकाणे धोकादायक बनली आहेत. शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी, नागरिक रस्त्याच्या दुतर्फा चालत असतात. मात्र, रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र उघडे आहे. तर तारांनी झाडांना स्पर्श केलेला आहे. हे प्रकार पावसाळ्यात एखाद्याच्या जीवावर बेतू शकतात. शहरातील नगर रोड परिसरामध्ये असणाऱ्या नगरपरिषदेच्या धर्मदाय जोशी उद्यानात तारांना झाडांनी विळखा घातला आहे. या ठिकाणी लहान मुले येतात तेव्हा त्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. महावितरण कार्यालयातच तारांना वेलींचा विळखा बीड जिल्ह्यातील जालना रोडला महावितरणाचे मुख्य कार्यालय आहे. मात्र या महावितरणाच्या मुख्य कार्यालयातच अनेक वेली आणि झाडांनी विद्युत तारांना विळखा घातलाय. ज्या ठिकाणीच जिल्ह्याचा विद्युतभाराचे व्यवस्थापन केले जाते त्याच कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी झाली नाही. त्यामुळे इतर ठिकाणचा प्रश्नच येत नाही, असे चित्र आहे. बीडवर वरुणराजे रुसले, अजूनही 21 प्रकल्प कोरडे; पाणीबाणीचं संकट! दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण होतील मागील काही दिवसांपासून मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. लवकरच ही कामे पूर्ण केली जातील, असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी मोहन दिवटे यांनी सांगितले.