मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपवरचा दबाव वाढला आहे. या निवडणुकीत उद्या म्हणजेच सोमवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सगळ्यात आधी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. तर शरद पवारांनीही ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. यानंतर उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेता निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या आमदारानेही ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. याबाबतचं पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
‘रमेश लटके जवळचे मित्र होते, पक्ष जरी वेगळा असेल तरी त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत आहे. विधानसभेची निवडणूक व्हायला दोन वर्षांचाच कालावधी आहे, अशावेळी जर ती निवडणूक बिनविरोध झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा कायम ठेवता आली, यासाठी मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही प्रयत्न करा, म्हणून मी विनंती केली आहे. शेवटी निर्णय घ्यायचे अधिकार भाजपला आहेत, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरिष्ठ नेते याबाबतीतला निर्णय घेतील, पण मी माझी भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे’, असं प्रताप सरनाईक म्हणाले. काय म्हणाले फडणवीस? राज ठाकरेंच्या या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रावर विचार ही करायचा झाला तर मला तो एकटा करता येणार नाही. माझ्या पक्षात मी काही एकटा निर्णय घेत नाही. बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल’ असं फडणवीस म्हणाले.