अहमदनगर
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 15 जून : नुकतेच अहमदनगर नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यातच आता आणखी एक जुनी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे आणि उत्तर विभागातील श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून श्रीरामपूरचे नागरीक लढा देत आहेत. मात्र, त्यांच्या आशेवर पाणी फिरणार अशी भावना श्रीरामपूरकरांची झाली आहे. कारण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या शिर्डी मतदारसंघात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून घेतले आहे. या निर्णयाविरोधात आज श्रीरामपूर जिल्हा कृती समीतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध केला. जुन्या मागणीसाठी श्रीरामपूरकर आक्रमक अहमदनगर जिल्ह्याचे जर विभाजन केले गेले तर भौगोलिक दृष्ट्या आणि प्रशासकीय कार्यालयांसह सुसज्ज असे श्रीरामपूर नव्याने जिल्हा व्हावा ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून असताना अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शिर्डीत मंजूर करणे हा आमच्यावर अन्याय असून या विरोधात शनिवारी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. वाचा - Devendra Fadnavis : शिवसेनेच्या जाहिरातीमुळे नाराज आहात का? फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टच सांगितलं बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेले संगमनेर मुख्यालय व्हावे यासाठी संगमनेर जिल्हा कृती समीती एकीकडे पाठपुरावा करतंय तर दुसरीकडे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहीजे यासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र, केवळ शिर्डीत जिल्हाधिकारी कार्यालय झाले म्हणजे लगेच शिर्डी जिल्हा होणार हा गैरसमज असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर केल्याची घोषणा केल्यानंतर आता विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा विभाजन झाल्यास संगमनेर, श्रीरामपूर की शिर्डी मुख्यालय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.