यवतमाळमध्ये जनजीवन विस्कळीत
यवतमाळ, 22 जुलै : यवतमाळमधून मोठी बातमी समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे सुमारे 45 लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी आता युद्धपातळीवर हलाचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.’ असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
जिल्ह्याला रेड अलर्ट यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ शहराला झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नदी नाल्याला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं आहे. यवतमाळ शहराला लागून असलेल्या वाघाडी गावात पहाटेच्या सुमारास पाणी शिरलं. येथील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे.