'हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते'
मुंबई, 19 फेब्रुवारी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाला, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिंदे गटाकडे गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी ट्वीट करून खळबळजनक आरोप केला आहे.
‘माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत’, असा आरोप राऊतांनी केला आहे. ‘हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते’, असा इशाराही राऊतांनी दिला.