Corona officer
मुंबई, 24 फेब्रुवारी : महाराष्ट्रासह देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाचा (coronavirus) उद्रेक झाला आहे. या राज्यांमुळे आता केंद्र सरकारची चिंताही वाढली आहे. त्यामुळे तिथल्या कोरोनाला (covid 19) नियंत्रित करण्यासाठी आता केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती (high level teams) तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये उच्च स्तरीय मल्टीडिसिप्लिनरी टीम रवाना करण्यात आली आहे. हे पथक राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करेल. आवश्यक ती पावलं उचलेल. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पातळीवरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील प्रशासनासोबत ही टीम काम करेल आणि कोरोना प्रकरणं का वाढत आहे, त्याची कारणं शोधेल. हे वाचा - 1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; फक्त या लोकांना मिळणार मोफत कोरोना लस दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला पत्रही लिहिलं आहे आणि आणि कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी अॅक्शन प्लॅन दिला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ती कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाप्रभावित जिल्ह्यांमध्ये आरटी-पीआर आणि रॅपिड अँटिजेन दोन्ही टेस्ट कराव्यात. लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करणं अनिवार्य असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे. पॉझिटिव्ह रुग्णाला आयसोलेट करावं किंवा रुग्णालयात दाखल करावं आणि ती व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली त्यांना शोधून त्यांचीही तात्काळ टेस्ट करावी. तसंच लसीकरणाचा वेग वाढवा, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. शिवाय राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्रानं पाठवलेल्या उच्च स्तरीय समितीला वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासही सांगण्यात आलं आहे. हे वाचा - आता तरी लसीकरणाचा वेग वाढवा; मोदी सरकारने ठाकरे सरकारला लिहिलं पत्र गेल्या एका आठवड्यात देशातील 12 राज्यात दररोज सरासरी 100 पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, दिल्ली आणि हरयाणाचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत देशातील सर्वाधिक प्रकरणं आहेत. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी 4,000पेक्षा जास्त नवे रुग्ण सापडत आहेत. या राज्यांमुळे देशातील कोरोना रुग्णांचा घटता आकडा पुन्हा वाढू लागला आहे.