मिलिंद गवळी
मुंबई, 02 मार्च : आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी घराघरात लोकप्रिय आहेत. त्यांच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मिलिंद गवळी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेक फोटो व्हिडीओ तसंच त्यांच्या भावना ते पोस्टमधून लिहित असतात. ते मालिकेतील सहकलाकारांबद्दल तसेच विविध किस्से, अनुभव नेहमीच शेअर करत असतात. आज मिलिंद गवळीनी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट वाचून चाहते देखील भावुक होताना दिसतायत. मिलिंद गवळीच्या आईला जाऊन आज चौदा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त त्यांनी आईसोबतचे अनेक फोटो आणि खास व्हिडीओ शेअर केला आहे. आईच्या आठवणीत हा अभिनेता भावुक झालेला दिसत आहे. मालिकेत मिलिंद गवळींनी विक्षिप्त आणि विकृत माणसाची भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते खूप हळवे आहेत हे त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट होत आहे. Jaya Bachchan: ‘मी तिच्या पाठीमागे राजकारण…’ सुन ऐश्वर्यासोबतच्या संबंधाविषयी स्पष्टच बोलल्या जया बच्चन आईची आठवण सांगताना मिलिंद गवळींनी लिहिलंय कि, ‘“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन, २ मार्च २००९ संध्याकाळी ६ वाजता माझ्या आईची गुरु, गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली, अफाट श्रद्धा आणि प्रेम, श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं, असीम प्रेम , सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणे, कोणालाही कधीही दुखवू नये , लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेला दोन घास खाऊ घालावे , मग तो मग तो कोणीही असो , मालक असो ड्रायव्हर असो राजा रंक असो, नातेवाईक असो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अतिथी देवो भव, स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करावा, प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्त्वाचं नाही,’'
ते पुढे म्हणतायत कि, ‘असंख्य उपवास, पूजा पाठ, देवदर्शन, शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मी ने मुंबईत राहायला घर दिलं, शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं, वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडन मागून घ्यायची, आणि त्याला द्यावं लागायचं , त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची, संतोषी मातेचे व्रत असो ,नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरूवरचा साईबाबा चे उपास तर आहे, सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास, बुधवारी माहीम चर्च ला जायचं, मदर मेरी शी सुद्धा तिची मैत्री होती, शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे’
’ ती जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती आहे , आपल्या जवळच आहे आपल्याला ती कधी सोडून गेलेलीच नाही अशी सतत जाणीव असते, मला तर खात्रीच वाटते , की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल, तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल, किंवा शिर्डीच्या साईबाबा च्या मंदिरात, किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करून देत असे. आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल. “मातृ देवो भव”. मिलिंद गवळीची ही पोस्ट वाचून चाहते देखील भावुक झाले आहेत.