तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
पुणे, 8 मार्च : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रायणी नदीत बुडून एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. होळी साजरी केल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत हातपाय धुण्यासाठी नदी पात्रात उतरला होता. मात्र त्याचा तोल गेला आणि तो पाय घसरून पात्रात पडला. यावेळी तिथे असलेल्या त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय 21 रा. तारखेड, पाचोरा, जिल्हा जळगाव) असं या नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो तळेगाव परिसरातील आंबी येथे असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता. मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण.. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील सात ते आठ विद्यार्थी धुलीवंदनाच आनंद लुटत होते. धुलीवंदन झाल्यानंतर हे तरुण रंग धुण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरले. मात्र यावेळी हातपाय धुत असताना जयदीप पाटील यांचा पाय घसरल्यानं तोल गेला आणि तो नदीत पडला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. जयदीपचा मित्र शरद राठोड याने या घटनेची माहिती तळेगाव एमआयडीस पोलिसांना दिली.
पोलिसांची घटनास्थळी धाव दरम्यान घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी इंद्रायणी नदीत जयदीपचा शोध घेतला. अखेर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी माहिती दिली. घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले.