नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट
अहमदनगर, 12 डिसेंबर : मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. रविवारी पुणे जिल्ह्यातील काही भागात सरी कोसळल्या. इंदापूर शहरात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास काही तालुक्यांमध्ये हलक्या, मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. हवेत आद्रता वाढल्याने रब्बी पिकांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. वाचा - Nashik : पंतप्रधान मोदींचं कांद्यावर चित्र काढून शेतकऱ्यांनी मांडली व्यथा, Video हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट कोल्हापूर शहराच्या काही भागांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली. अवकाळी पावसानंतर पाराही घसरला असून वातावरणात थंडी जाणवत आहे. आज सकाळपासन कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सिद्धनेर्ली, बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावांमध्ये पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, मंदोस वादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुन्हा दोन दिवस ढगाळ वातावरण जिल्ह्यात पुन्हा दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. यादरम्यान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी शेतात काम करताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर हलक्या ते अति हलक्या स्वरुपाच्या अवकाळी पावसामुळे तसेच तापमानामध्ये अति घट झाल्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाच्या पिकांवर परिणाम दिसून येतो. तापमानात घट झाल्यामुळे रोपांची वाढ खुंटताना दिसून येते. त्याच्या व्यवस्थापनाकरिता रात्री पिकांवर पॉलिथीन पसरवून ठेवावे जेणेकरून घटलेल्या तापमानाचा परिणाम होणार नाही, असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.