जयपूर, 28 जानेवारी : सध्याच्या काळात काही जण आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायलाही मागे-पुढे पाहत नाहीत; मात्र काही असेही आहेत, की जे आई-वडिलांना देव मानून त्यांची पूजा करतात. इतकंच नाही, तर त्यांचं मंदिरही बांधतात. राजस्थानातल्या झुंझुनू गावात तसं एक मंदिर बांधण्यात आलंय. लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेऊन 6 मुलांनी आपल्या आई-वडिलांचं एक मंदिर बांधलं आहे व रोज तिथे पूजाही केली जाते. ही घटना सध्याच्या काळातली वाटत नसली, तरी ती खरी आहे. आई-वडिलांची सेवा करण्यात धन्यता मानून 6 भावंडांनी केलेली भीष्मप्रतिज्ञा आणि त्यांची भक्ती अनोखी आहे.
आई-वडिलांची सेवा करणाऱ्या श्रावणबाळाप्रमाणेच राजस्थानातल्या झुंझूनू गावातल्या 6 भावंडांची गोष्ट आहे. आपल्या आई-वडिलांना सांसारिक चिंतांमधून मुक्ती मिळावी व त्यांनी दाखवलेल्या भक्तिमार्गावरून आपल्याला जाता यावं, यासाठी त्या सर्वांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भीष्मप्रतिज्ञेला आता 30 वर्षं झाली आहेत. झुंझुनू गावात बाबा गंगाराम यांचं एक मंदिर आहे. बाबा गंगाराम यांना भगवान विष्णूंचा अवतार मानतात. तिथे अनिल मोदी, प्रवीण मोदी हे दोघं भाऊ व त्यांच्या अमिता, सुनीता, विनिता व बेलाकुमारी या 4 बहिणी पहाटे 4 वाजता उठून सेवा करतात. झुंझुनूच्या पंचदेव मंदिरात हे सारे भक्तांना मार्गदर्शन करतात. या मंदिराची स्थापना 1975मध्ये करण्यात आली.
वाचा - धीरेंद्र शास्त्रींचे सत्य काय? देवघरचे पुरोहित म्हणतात, सर्वात मोठा चमत्कारी इथे
देवकीनंदन व त्यांची पत्नी गायत्री देवी या मंदिराच्या स्थापनेआधीपासूनच त्यांचे जन्मदाते बाबा गंगाराम यांची भक्ती करत होते. त्यांनी त्यांच्या मुलांना कोलकात्यातल्या सेंट झेव्हियर्स शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी ठेवलं होतं. मंदिराची स्थापना झाल्यावर देवकीनंदन व त्यांच्या पत्नीनं संपूर्ण जीवन तिथंच व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, 1990मध्ये त्यांचा मोठा मुलगा अनिल यालाही संपूर्ण जीवन आई-वडिलांची सेवा करण्यात घालवावं असं वाटलं. त्यांनी भावंडांना त्याबाबत सांगितलं व सर्वांनी बाबा गंगाराम व आई-वडिलांची सेवा करण्यासाठी लग्न न करता तिथं राहण्याचा संकल्प केला. आई-वडिलांनी त्यांना खूप समजावलं; मात्र त्या भावंडांनी ऐकलं नाही. वंश चालवण्यासाठी व संपत्तीच्या वारशासाठी तरी लग्न करावं असं आई-वडिलांनी सांगूनही त्यांनी निश्चय मोडला नाही. त्यांनी संपत्ती व सांसारिक सुखांचा त्याग केला. त्या वेळी धाकटी बहीण 16 वर्षांची तर अनिल मोदी 30 वर्षांचे होते.
आपल्या संसाराच्या काळजीनं आई-वडिलांच्या भक्तीमध्ये बाधा येऊ नये, यासाठी त्या सर्वांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी गंगाराम मंदिर परिसरात त्यांचंही एक मंदिर बांधलं. आजही ते ब्रह्मचर्याचं पालन करून आई-वडील व आजोबांची भक्तिसेवा करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.