मुंबई, 08 एप्रिल : देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. यातच दिल्लीत निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशातील अनेक राज्यांत याचा प्रादुर्भाव झाला. तबलिगींनी त्यांची माहिती लपवून ठेवल्यानंही कोरोनाच्या रुग्णांची संख्या अनेक ठिकाणी झपाट्यानं वाढली. यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनावरून दिल्लीतल्या केजरीवाल सरकारवर आणि केंद्रावरही आरोप केले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात याच कार्यक्रमाच्या आयोजनाला महाराष्ट्र सरकारनं परवानगी नाकारली होती. मात्र दिल्लीत केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्यानं मरकजला परवानगी कशी दिली असा प्रश्न विचारणारं पत्र व्हायरल होतं आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या लेटर हेडवर असेललं हे पत्र हिंदी आणि मराठी भाषेत आहे.
पत्रामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारवर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मरकजच्या शेजारीच पोलिस स्टेशन असताना आयोजन थांबवलं का नाही? यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा प्रश्न त्यात आहे. याशिवाय इतरही अनेक प्रश्न या पत्रात विचारण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील ‘तब्लिगी जमात’च्या कार्यक्रमाला सरकारने रोखलं. मात्र दिल्लीत मरकजच्या शेजारीच पोलिस स्टेशन असताना आयोजन थांबवलं का नाही? मरकजमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व राज्यात झाला, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दोन वाजता मरकजमध्ये पाठवलं. हे काम डोवाल यांच नसून दिल्ली पोलिस आयुक्तांचं आहे. अजित डोवाल आणि तब्लिगीचे मौलाना साद दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त मंथन करत होते? असंही पत्रात लिहिलं आहे.
निजामुद्दीन, दिल्ली येथील तब्लीगी मर्कज़ मध्ये जी लोकं सामील झाले होते त्यांतील अजूनही ५०-६० जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यंना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वॉवरनटाय्न मध्ये भरती व्हावे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 7, 2020
अनिल देशमुख यांनी तबलिगींबाबत मंगळवारी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये मरकजमध्ये सहभागी झालेल्या काही लोकांचे फोन ऑफ लागत आहेत आणि त्यांनी लवकर संपर्क साधावा असं म्हटलं होतं. अनिल देशमुख यांना या पत्राबाबत विचारलं असता त्यांच्याकडून अधिकृत अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हे वाचा : कोरोनाशी लढण्यासाठी US, UK सह 18 देशांनी मोदींना केलं प्रमुख? मेसेज होतोय VIRAL