रामकुमार नायक, प्रतिनिधी जशपूर, 17 जुलै : बाजारात हंगामी फळ, भाज्यांना विशेष मागणी असते. त्यानुसार सध्या मशरूमला प्रचंड मागणी आहे. मात्र पावसाळ्यात उगवणारं हे मशरूम अतिशय पौष्टिक असलं, तरीही त्यांची वाढ जंगलात होत असल्याने खरेदी करताना काळजी घ्यावी, असं तज्ज्ञमंडळी वारंवार बजावत असतात. पावसात बिळांमधून विषारी प्राणी बाहेर पडतात, या प्राण्यांचा स्पर्श झालेला असल्यास मशरूम खाणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. असाच एक धक्कादायक प्रकार छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील चलनी गावातून समोर आला आहे. चलनीमध्ये अलीकडेच एक सामाजिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शेकडो लोक सामील झाले होते. यावेळी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. जेवणात खास मशरूमच्या भाजीचा समावेश होता. मात्र ही भाजी खाताच लोक आजारी पडले. सर्वांना मळमळ होऊ लागली, उलटीसारखं वाटू लागलं. अनेकजण चक्कर येऊन कोसळले. जवळपास 15 जणांची तब्येत बिघडली. या सर्वांना सन्ना सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून दोन महिलांची प्रकृती नाजूक असल्याचं कळतं आहे.
गंभीर बाब म्हणजे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या आरोग्य केंद्रात केवळ एक डॉक्टर आणि दोन कर्मचारी उपस्थित आहेत. या डॉक्टरांनी सर्व रुग्णांवर प्राथमिक उपचार केले असून जंगलात आढळणारे काही मशरूम विषारी असतात ते खाल्ल्यानेच सर्वांची तब्येत बिघडल्याचं म्हटलं आहे. पावसाळ्यात तुम्हीही मशरूम आवडीने खाताय तर सावधान; डॉक्टरांनी सांगितला याचा धोका दरम्यान, छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलांमध्ये मिळणाऱ्या या भाजीला तिथे ‘खुखडी’ असं म्हणतात. या भाजीत मुबलक प्रमाणात पौष्टिक तत्त्व असल्याने तिला मोठी मागणी असते. त्यामुळेच ती 1200 रुपये किलो दराने विकली जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात बिळाबाहेर पडणाऱ्या विषारी प्राण्यांचा स्पर्श जमिनीत उगवणाऱ्या मशरूमला झालेला असू शकतो किंवा मशरूम बिळांजवळ वाढलेलं असू शकतं. यापैकी कोणतीही शक्यता आपल्याला महागात पडू शकते. म्हणूनच खरेदी करताना चांगलं मशरूम ओळखणं आवश्यक असतं.