मुंबई, 25 फेब्रुवारी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आकाश कोबनाक हा विद्यार्थी युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) अडकला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले होते. हे आठही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड शहरातील आकाश कोबनाक या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता, त्यांचे कुटुंबीय अतिशय चिंतेत असून आकाशला मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न करावेत तसेच भारतातील सर्व जण सुखरूप यावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. आकाशचे वडील अनंत कोबनक यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी.
आकाश युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला आहे. पाच मार्च रोजी तो मायदेशी परतणार होता. परंतु अचानक रशियाने हल्ला केला आणि देशातील अनेक विद्यार्थ्यांबरोबर आकाशही तेथे अडकला आहे. हे ही वाचा- मोठी बातमी: युक्रेनच्या राजधानी कीवमध्ये घुसले रशियन सैनिक, पूलही उडवला
'कधी काहीही होऊ शकतं'; रत्नागिरीच्या आकाशने सांगितली युक्रेनमधील भयावह स्थिती 2/2 pic.twitter.com/5mOAiNKT9e
— News18Lokmat (@News18lokmat) February 25, 2022
सध्याची परिस्थिती खूप गंभीर असल्याचे त्याचे म्हणणे असून कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं या भीतीने सगळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे त्याने न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना सांगितलं. दरम्यान युक्रेनच्या युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना (Indians) परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवलं जाणार आहे. शेजारील देशांतून भारतीय नागरिकांचे आगमन झाल्यानंतर विशेष उड्डाणे चालवली जातील. सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी उड्डाणांचा खर्च फक्त केंद्र सरकार (Central Government) उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या CCS बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.