ऐझॉल, 05 मार्च: म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर सुरू झालेलं आंदोलन (Protest In Myanmar) उग्र रुप घेताना दिसत आहे. या धगधगत्या आंदोलनाला शांत करण्यासाठी म्यानमार प्रशासनाने मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Violation) सुरू केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय वातावरण तापलं असून अनेक लोकशाहीवाद्यांनी म्यानमारमधील लष्कर प्रशासनावर (Army Rule) टीका केली आहे. एकंदरित असं चित्र असताना आता म्यानमारचे नागरिक भारतात पलायन करत असल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारचे नागरिक भारतीय सीमा ओलांडून अवैध पद्धतीने भारतात प्रवेश (Citizens of Myanmar are entering in India illegally) करीत आहेत.
एका रिपोर्टनुसार, म्यानमारचे काही नागरिक भारतीय सीमा ओलांडून मिझोराममध्ये पोहचले आहेत. 1 फेब्रुवारीपासून म्यानमारमध्ये लष्करी सत्ता अंमलात आणली आहे. अशात लष्करी प्रशासनाने आंदोलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तेथील काही पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे म्यानमारमधील परिस्थिती आणखी चिघळत आहे.
गेल्या बुधवारी म्यानमारमध्ये 38 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. त्यामुळे येथील हिंसाचाराला घाबरून अनेक नागरिक भारतात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका रिपोर्टनुसार, बुधवारी 9 जणांनी 1600 किमीची सीमा ओलांडून मिझोरममध्ये प्रवेश केल्याची माहिती भारतीय पोलिसांनी दिली आहे. तर बुधवारपासून किमान 20 जणांनी सीमा ओलांडली आहे. शिवाय म्यानमारमधून घुसखोरी केलेले किमान 50 नागरिक चंपाई आणि सर्चीप जिल्ह्यांत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी कुमार अभिषेक यांनी सांगितलं की,' संबंधित लोकांची ओळख पटवून म्यानमारमधून पलायन करण्याची कारणं राज्याच्या गृहविभागाला कळवण्यात आली आहेत.'
इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सने मिझोरमच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटलं आहे की, स्थानिक लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. म्यानमारमधून घुसखोरी केलेली लोकं दिसताच त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना त्वरित द्यावी अशा सुचना स्थानिकांना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा -आता नोकरदार महिला IS च्या रडावर? अफगाणिस्तानात 3 महिला पत्रकारांची हत्या
यावेळी चंपाईचे उप आयुक्त मारिया सीटी जुआली यांनी सांगितलं की, 'म्यानमारमधून भारतात प्रवेश केलेल्या लोकांच्या जीवाला खरंच धोका आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.' जुआली यांनी पुढे सांगितलं की,"या लोकांना जर शरणार्थी म्हणून ठेवण्यास परवानगी नाही मिळाली, तर त्यांना परत हद्दपार केलं जाईल." काही दिवसांपूर्वी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा म्हणाले होते की, 'म्यानमारहून येणाऱ्या लोकांचं मिझोराम राज्य स्वागत करेल. शिवाय त्यांच्या अन्नाची आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जाईल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.