मोबाइल ही आता अत्यावश्यक गरज बनली आहे. अनेकांची दैनंदिन कामं मोबाइलवरच होतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोबाइलच्या कार्यप्रणालीत अनेक बदल होत गेले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोन सिम कार्ड्सचा होणार वापर. अनेक जण दोन सिम कार्ड्सचा स्मार्टफोन बाळगतात. परंतु, टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे युझर्सना दोन सिम कार्ड्सऐवजी एकाच सिम कार्डचा वापर करणं परवडू शकेल आणि त्यामुळे दोन सिम कार्ड्सचा वापर कमी होऊ शकेल, असा अंदाज आहे.
दोन सिम कार्ड्सच्या वापरावर बंधनं?
दोन सिम कार्ड्स असली, तर गरजेनुसार दोन्ही सिम कार्ड्स वापरता येत होती. मिनिमम मूल्याचं रिचार्ज करून व्हॅलिडिटी संपल्यावर काही दिवस मिळणाऱ्या फ्री इन्कमिंग सेवेचा लाभ घेता येत होता. परंतु, आता परिस्थिती निराळी आहे. कारण टेलिकॉम ऑपरेटर्सचे रिचार्ज प्लॅन्स महाग होत चालल्यामुळे युझर्सना केवळ एकच सिम कार्ड वापरणं परवडू शकेल. असं म्हटलं जातंय की, टेलिकॉम कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे जे सिम वापरात आहे ते सुरू ठेवणंही महागडं होणार आहे. परिणामी, आपोआपच दोन सिम कार्ड्सच्या वापरावर बंधनं येतील.
मागच्या वर्षाप्रमाणेच या वर्षीही रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत 20 ते 25 टक्के वाढ होऊ शकते. टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्ज प्लॅन्सच्या दरामध्ये वाढ करण्याबद्दल गेले अनेक दिवस चर्चा आहे. प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ झाल्यास कंपनीच्या एआरपीयू अर्थात एकंदर रेव्हेन्यूमध्ये वाढ होईल. याबाबत एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी अनेक वेळा भाष्य केलं आहे. 5जी सर्व्हिस लॉंचमुळे कंपन्यांना प्लॅन्सच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी आणखी एक कारण मिळालं आहे.
हेही वाचा - PHOTOS: आता Whatsapp सिक्रेट चॅट डिलीट करण्याची गरज नाही, सोपं आहे लपवणं
दुसर्या वाजवी दरातल्या टेलिकॉम कंपनीच्या सर्व्हिसचा लाभ घेणं याच एकमेव हेतूने डबल सिम कार्ड वापरण्याची पद्धत सुरू झाली. आता जवळपास सगळ्या टेलिकॉम कंपनीजच्या प्लॅन्सचं मूल्य जवळपास सारखंच आहे. येणार्या काळात ही तफावतही उरणार नाही. तशा स्थितीत दोन सिम कार्ड्स बाळगली, तर दोन्ही कार्ड्ससाठी प्रत्येकी तेवढाच खर्च येईल. असं झाल्यास युझर्स नक्कीच दुसरं सिम कार्ड बंद करू शकतील. कारण, एकाच किमतीचे दोन प्लॅन्स घेणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही.
मिनिमम रिचार्ज प्लॅनचं गाजर
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ केल्याचं दिसून आलं. या वर्षीही तशीच परिस्थिती आहे. कारण, एअरटेलने भाववाढीसंदर्भात स्पष्टपणे सूतोवाच केलं आहे. नुकतंच एअरटेल कंपनीकडून त्यांच्या मिनिमम रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ करण्यात आली. यापूर्वी, युझर्सना मिनिमम प्लॅनसाठी 99 रुपये खर्च करावे लागत होते. परंतु, भाववाढीनंतर आता युझर्सना त्यासाठी 155 रुपये मोजावे लागतील. यामुळे कंपनीला 57 टक्के नफा होणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रिचार्ज प्लॅन्समधील ही भाववाढ प्रायोगिक तत्त्वावर आहे. परंतु, लवकरच ही वाढ इतर प्लॅन्सच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. एअरटेलने मागच्या वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ केली होती. त्या वेळी कंपनीने 79 रुपयांच्या मिनिमम रिचार्जची किंमत 99 रुपयांवर नेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Sim, Technology