नवी दिल्ली, 3 जुलै : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. रिलायन्स जिओने जगातला सर्वात स्वस्त 4जी मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईलची किंमत केवळ 999 रुपये असणार आहे. शिवाय यात रिलायन्स जियोच्या इतर मोबाईलसारखेच जिओ सिनेमा, जिओ सावन, जिओ मनी, असे भन्नाट फिचर्स असणार आहेत. कंपनीने या मोबाईलला ‘Jio Bharat V2’ असं नाव दिलं आहे. बाजारात सध्या 4जी मोबाईलची किंमत 2 हजारांपासून सुरू होते. त्यामुळे 999 रुपयांना मिळणार हा मोबाईल सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा ठरेल. ‘जिओ भारत V2’ ची किंमत ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व फोन्समध्ये सर्वात कमी आहे. 999 रुपयांमध्ये उपलब्ध ’ जिओ भारत V2’ चा मासिक प्लॅन देखील सर्वात स्वस्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागतील. इतर ऑपरेटर्सच्या व्हॉईस कॉल आणि 2 GB मासिक योजना केवळ 179 रुपयांपासून सुरू होतात. याशिवाय, कंपनी ‘जिओ भारत V2’ च्या ग्राहकांना 14 GB सह 4G डेटा देईल, म्हणजेच प्रति दिन अर्धा GB, जो स्पर्धकांच्या 2 GB डेटापेक्षा 7 पट जास्त आहे. ‘जिओ भारत V2’ वर एक वार्षिक प्लॅन देखील आहे, ज्यासाठी ग्राहकाला 1234 रुपये द्यावे लागतील.
रिलायन्स जीओ कंपनीने 250 दशलक्ष 2G ग्राहकांना 4G वर आणण्यासाठी ‘जिओ भारत’ प्लॅटफॉर्म देखील लॉन्च केला आहे. इतर कंपन्या 4G फोन बनवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील. कार्बननेही त्याचा वापर सुरू केला आहे. 2G फीचर फोनची जागा लवकरच 4G भारत सीरीज मोबाईल घेईल अशी तज्ञांची अपेक्षा आहे. यावेळी बोलताना रिलायन्स जिओचे चेअरमन श्री.आकाश अंबानी म्हणाले, “देशात अजुनही 25 कोटी ग्राहक 2G युगात अडकून पडले आहेत. देश आज 5G युगात पोहोचला असताना हे ग्राहक इंटरनेट च्या मूलभूत गोष्टींपासून वंचित आहेत. 6 वर्षांपूर्वी आम्ही जिओ सादर करताना आम्ही सर्वतोपरी ठरविले होते की, इंटरनेटचा वापर हा काही मर्यादित घटकांपूरता न राहता या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक भारतीय करू शकेल. नवीन जिओ भारत फोन हा या दिशेने टाकलेलं पुढचे पाऊल असून याद्वारे भारतातील डिजिटल डिव्हाईड पूर्णपणे संपुष्टात येऊन आम्ही प्रत्येक भारतीयाचे या मोहिमेत सामील होण्यासाठी स्वागत करत आहोत. " श्री.आकाश अंबानी पुढे म्हणाले. 2G ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 2018 मध्ये जिओफोन देखील आणले. जिओफोन आजही 13 कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती आहे. कंपनीला ‘जिओ भारत V2’ कडूनही त्याच अपेक्षा आहेत. कंपनीने 7 जुलैपासून ‘जिओ भारत V2’ ची बीटा चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा ’ जिओ भारत V2’ 6500 मध्ये नेण्याचा मानस आहे. असा आहे जिओ फोन देशात बनवलेला आणि फक्त 71 ग्रॅम वजनाचा, ‘जिओ भारत V2’ 4G वर काम करतो, यात HD व्हॉईस कॉलिंग, FM रेडिओ, 128 GB SD मेमरी कार्ड सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. मोबाईलमध्ये 4.5 सें.मी. की TFT स्क्रीन, 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा, 1000 mAh बॅटरी, 3.5 मिमी हेडफोन जॅक, शक्तिशाली लाऊडस्पीकर आणि टॉर्च उपलब्ध आहेत. जिओ भारत V2 मोबाईल ग्राहकांना जिओ सिनेमा च्या सबस्क्रिप्शनसह जिओ सावन मधील 80 दशलक्ष गाण्यांमध्ये प्रवेश मिळेल. ग्राहक जिओ पे द्वारे UPI वर व्यवहार देखील करू शकतील. भारतातील कोणतीही प्रमुख भाषा बोलणारे ग्राहक तुमच्या भाषेत जिओ भारत V2 मध्ये काम करू शकतील. हा मोबाईल 22 भारतीय भाषांमध्ये काम करू शकतो.दरम्यान, देशभरात रिलायन्स जिओचे तब्बल 43 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. आता ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मोबाईल पोहोचवण्याचं रिलायन्सचं ध्येय आहे.