मुंबई, ६ जानेवारी : भारतीय संघातील स्टार फलंदाज संजू सॅमसन याला दुखापतीच्या कारणामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी २० मालिकेतुन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. श्रीलंके विरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात झेल पकडताना संजूला दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला, यासामन्या दरम्यान प्रेक्षकांना संजूची कमी जाणवली. परंतु संजूने केलेल्या इंस्टाग्राम पोस्टनंतर चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हे ही वाचा: विराट, रोहितने नाही दिली संधी; धोनीच्या फेवरेट प्लेअरने केली कमाल भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसन हा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या ऐवजी राहुल त्रिपाठी याला श्रीलंके विरुद्ध मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. परंतु संजू सॅमसनने केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. संजूने त्याचा एक फोटो पोस्ट करून त्याखाली “All is well” असे लिहिले. संजूच्या या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले. संजूच्या चाहत्यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करून लिहिले की, जर संजू खरंच बारा आहे तर मग त्याला बीसीसीआयने संघाबाहेर का काढले?
संजूच्या चाहत्यांनी यापूर्वी देखील त्याला भारतीय संघात संधी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू आपल्या फलंदाजीने फार कमाल दाखवू शकला नव्हता. त्याने संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरून अवघ्या ५ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात भारतने श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळून मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली होती. परंतु कालचा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत भारतासोबत १-१ ने बरोबरी साधली.