नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : भारतीय संघ सध्या कसोटीमध्ये नंबर एक वर आहे. मात्र भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केलं. वेलिंग्टनमध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली दोन्ही डावात अपयशी ठरला. पराभवाचं खापर त्याने टॉसवर फोडलं. टॉस महत्वाचा ठरल्याचं विराट म्हणाला. पण खरंतर टीम इंडियासाठी टॉस फार महत्वाचा नसल्याचं याआधी अनेकदा विराटच म्हणाला आहे.
विराटने नाणेफेकीवरून केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. भारतानं न्यूझीलंडमध्ये फक्त एकच कसोटी जिंकली आहे ज्यामध्ये नाणेफेकही होती. भारताने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत एकूण 24 कसोटी खेळल्या आहेत. यात पाच विजय तर नऊ वेळा पराभव झाला आहे. याशिवाय दहा कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाचे रेकॉर्ड
भारताने न्यूझीलंडमध्ये जे पाच सामने जिंकले आहेत त्यापैकी चार सामन्यात नाणेफेक गमावली होती. न्यूझीलंडमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर भारताने 11 पैकी 4 सामने जिंकले तर चारमध्ये पराभव झाला. भारताने गेल्या 44 वर्षात न्यूझीलंडमध्ये 19 कसोटी खेळल्या आहेत. यातील आठ सामन्यात पराभव पत्करावा लागला. 19 सामन्यांपैकी 12 मध्ये भारतानं नाणेफेक जिंकली होती यातील फक्त एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता. हॅमिल्टनमध्ये 2009 ला तो सामना झाला होता. सध्या संघात असलेला इशांत शर्माही त्यावेळीही खेळला होता.
नाणेफेक महत्वाची ठरली याचाच अर्थ विराटला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं होतं. भारताने न्यूझीलंडमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडमध्ये भारताने 13 सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण केलं आहे. यापैकी चार सामने जिंकले आणि चार गमावले. तर प्रथम फलंदाजी करताना फक्त एकच सामना जिंकता आला तोसुद्धा 1968 मध्ये.
भारताला वेलिंग्टन कसोटीत दहा विकेटनी पराभव पत्करावा लागला. भारताने या सामन्यात नाणेफेक गमावली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संघ 165 धावाच करू शकला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा करून 183 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 191 धावा करू शकला.
नाणेफेक जिंकल्यानंतर जय-पराजय
ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर 29 सामने खेळले आहेत. यातील 21 सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. यात तीन सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाना नाणेफेक जिंकल्यानंतरही शेवटचा पराभव 2011 मध्ये पत्करावा लागला होता. न्यूझीलंडने याच काळात 17 सामन्यापैकी 10 मध्ये नाणेफेक जिंकली आहे. यातील दहापैकी एकही सामना गमावला नाही. न्यूझीलंडचा असा शेवटचा पराभवा 2009 मध्ये झाला होता. तर भारताने 23 पैकी 18 सामन्यात नाणेफेक जिंकली. यातील दोन सामने भारताने भारताने गमावले आहेत.
वाचा : ही कसली कॅप्टन्सी? फॉर्ममधल्या खेळाडूंनाच विराटनं दिली नाही जागा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Virat kohli