मुंबई, 27 जानेवारी : पहिल्याच अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाने शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पार्शवी चोप्राच्या भेदक माऱ्यानंतर श्वेता सेहरावतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १०७ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान फक्त १४.२ षटकातच पूर्ण केलं.
भारताची फायनलमध्ये लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याशी होणार आहे. या दोन्ही संघामध्ये सेमीफायनल लढत अद्याप झालेली नाही.
भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना न्यूझीलंडला १०७ धावात रोखलं. चर्जिया प्लीमरने ३५ तर एजाबेल गेजने २६ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त इतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. तर भारताकडून पार्शवीने ४ षटकात २० धावा देत ३ विकेट घेतल्या.
हेही वाचा : भारत-न्यूझीलंड पहिला टी20 सामना आज, टीम इंडियाची यंग ब्रिगेड उतरणार मैदानात
फलंदाजीत भारताच्या श्वेता सेहरावतने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर संयमी खेळी करत श्वेताने भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. तिने ४५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
भारताने आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केलीय. ग्रुप डीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिका, युएई आणि स्कॉटलंडसोबत भारतीय संघ होता. भारताने सर्व सामने जिंकून सुपर सिक्समध्ये स्थान मिळवलं होतं. सुपर सिक्स फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानतंर श्रीलंकेविरुद्धचा सामना एकतर्फी जिंकून सेमीफायनल गाठली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.